नदी- ईकारांत स्त्रीलिंगी. नदी-नदयौ-नद्या: प्रथमा एकदम संस्कृतच्या तासाला बसल्यासारखं वाटलं नाही ! नदी हा शब्द स्त्रीलिंगीच का बरे झाला असावा? स्त्री नाही का आपला उगम सोडून दुसरीकडे जाऊन विलीन होते तसच नाही का नदीचं पण? दूर डोंगरात उगम पावून अगदी पल्याड त्या सागरात जाऊन विलीन होते की नदी! म्हणूनच बहुदा नदी हा स्त्रीलिंगी शब्द असावा.
असं म्हणतात की ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये! पण नदी जिथून उगम पावते तिथपासून ते अगदी जिथे सागराला जाऊन मिळते तिथपर्यंत सर्वांचे जीवन समृद्ध करत जाते. डोंगरावरून वाहत येताना सोबत गाळ घेऊन येते आणि संथ वाहते त्या प्रांतात काठावर तो गाळ पेरून जमीन कशी सुपीक करून जाते. स्त्रीचं पण तसंच नाही का? माहेरच्या संस्कारांचं संचित घेऊन सासरी पेरत मुलाबाळांना वाढवत सुपीक बनवत असते तीही अविरत अगदी नदीसारखी!
संस्कृत भाषेत प्रत्येक शब्दाची विविध रूपे असतात विभक्तीप्रमाणे. नदीची पण अशीच अनेक रूपं बघायला मिळतात आपल्याला, ऋतूंनुसार; प्रदेशानुसार! पावसाळ्यात धोधो ओसंडून वाहणारी, हिवाळ्यात पाणी ओसारल्याने शांतपणे संथ वाहणारी आणि उन्हाळ्यात पाणी आटल्याने बऱ्याचदा एकाजागीच डबकं झाल्यासारखी साठून राहिलेली. पण हे तात्पुरतच! पुन्हा पावसाचं सरी धरणीवर बरसल्या की नदी परत खळाळून उठते, वाहते, मार्गक्रमण करते. स्त्रीचं पण तसंच बालवयात अल्लडपणे अवखळपणे बागडणारी, यौवनात संथपणे पण लयदार चालणारी आणि म्हातारपणी अनुभवाचं बोचकं सोबत घेऊन आपल्याच मुलानातवंडात रमणारी!
इतिहासाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की सगळ्या प्रगत संस्कृतींचा उगम आणि विकास हा नदीच्या काठाकाठानच झाला आहे. सिंधू, हडप्पा अगदी परदेशातल्या मेसोपोटेमिया, इजिप्शियन,माया वगैरे सगळ्याच संस्कृतीचा जन्म नदीकाठीच झाला त्या वाढल्या बहरल्या. नदीला जीवनदायिनी पण म्हणतात ते म्हणूनच. नदीकाठच्या सुपीक जमिनीवर शेती करत खरं तर शिकत शिकत मानवी वस्ती नदीकाठी स्थिरावली, वाढली. नदीचे पाणी शेतीसाठी वापरले तसेच वाहतुकीसाठीही त्याचा वापर झालाच की! त्यामुळे व्यापार उदीम वाढला. नदीपात्रात मासेमारी सारखे व्यवसाय वाढू लागले आणि सर्वत्र एक समृद्धी पसरली.

नदी, डोंगरात उगम पावते तिथून सागराच्या ओढीने धावत सुटते, वाटेत येणारे अनेक अडथळे पार करत करत, अनेक ओहोळ; नाले; लहान लहान झरे या सर्वांना स्वतःमध्ये सामावून, काही वेळा वाट बदलून, काही वेळा पात्र रुंदावून, काही वेळा संथ होऊन पण शेवटी ती सागराला मिळतेच, समर्पित होते.
स्त्रीचं पण तसंच आहे नाही का? अनेक गोष्टी तिच्या प्रगतीच्या आड येतात पण ती निडरपणे त्यांचा सामना करून वाहतच राहते. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन त्या घराचा उत्कर्ष करणं काय सोप्पं काम आहे काय? ती सुद्धा जीवनदायिनी आहेच की! मुलांना जन्म देऊन त्यांना संस्कारांचे शिक्षणाचे संचित देऊन समाजात तीच तर धाडते. अनेक खाचखळगे, अनेक अपमान, अनेक उपेक्षा, अनेक अपेक्षाभंग सहन करूनही ती आपला जीवनप्रवाह तसाच प्रवाहित ठेवते.
नदीचं ध्येय सागरात विलीन होणं हे सगळ्यांनाच माहीत आहे पण स्त्रीचं ध्येय काय आहे हे तिला तरी कळलंय का?
– उमा जोशी





