शिवभक्त सुभाष पारकर, अभिषेक भाटकर घेणार १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन
रत्नागिरी : प्रतिनिधी
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारमलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्।सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः| सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
हिंदु धर्मानुसार असं म्हटले जाते की, जी व्यक्ति “बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरूप मंत्र” जर दररोज पहाटे व सायंकाळी जप केला तर सात जन्मातील झालेल्या पापाचा ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे विनाश होतो. तरीही आपण हा मंत्रही म्हणत नाही आणि या देवांचे स्मरणही करत नाही. असं म्हणतात की आयुष्यात बारा ज्योतर्लिंग आणि अष्टविनायक दर्शन झाले की आयुष्याचे सोने झाले. मात्र प्रत्येकाला हे दर्शन करणे शक्य होत नाही. हे शक्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि भक्ती याचा सुरेख संगम असायला लागतो. असा सुरेख संगम असणारे रत्नागिरीतील जकिमिऱ्या अलावा येथील शिवशंकर भक्त सुभाष पारकर आणि कर्ला येथील शिवभक्त अभिषेक भाटकर हे दोघे या बारा ज्योतर्लिंगांचे दर्शन करणार आहे. तसा त्यांचा प्रवास सुरू झाला असून हा सुमारे १० हजार किमीचा संपूर्ण प्रवास ते दुचाकीने करणार आहेत.
हिंदू धर्म प्रथा आणि पुराणातील संदर्भानुसार बारा ज्योतिर्लिंगे – सोमनाथ (गुजरात), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश), महांकाळेश्वर (मध्यप्रदेश), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), वैजनाथ (झारखंड), भीमाशंकर (महाराष्ट्र),रामेश्वर (तामिळनाडू), नागनाथ (गुजरात), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र), केदारनाथ (उत्तराखंड), घृष्णेश्वर (महाराष्ट्र) ही आहेत. हा संपूर्ण प्रवास १० हजार किमीचा आहे. या प्रवासाला १५ मे रोजी रत्नागिरीतून सुरुवात झाली असून संपूर्ण प्रवास हा हिंदुस्थानच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या तीन दिशेला होणार आहे. रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव कालभैरवाच्या आशीर्वादाने या प्रवासाला सुरुवात झाली असून हा प्रवास शेवटी याच भैरी मंदिरात येऊन महिन्याभराने पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, झारखंड, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातून हा प्रवास होणार आहे. कलियुगात शिवभक्ती करणाऱ्या आणि शिवाच्या आशिर्वादासाठी रत्नागिरीतून दर्शनासाठी निघालेल्या पारकर आणि भाटकर यांचे कौतुक होत आहे.




