रत्नागिरी : प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी ठरलेले नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ, अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक आणि विधी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व अॅड. पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत अधिवक्ता परिषद, रत्नागिरी जिल्हाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात जंगी सत्कार करण्यात आला. रत्नागिरी बार असोसिएशनच्या कार्यक्रमानिमित्त अॅड. पांडे यांचे रत्नागिरीत आगमन झाले असता, त्याचे औचित्य साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र स्टेट लीगल एडच्या सदस्या तसेच अधिवक्ता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या अॅड. प्रिया लोवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष अॅड. मनोहर जैन यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या केळकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिवक्ता परिषद सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सत्काराला उत्तर देताना अॅड. पारिजात पांडे यांनी अधिवक्ता परिषद ही केवळ संघटना नसून वकिलांच्या व्यावसायिक उन्नतीबरोबरच न्यायव्यवस्थेतील मूल्यांचे जतन करणारी चळवळ असल्याचे सांगितले. तरुण वकिलांनी सातत्याने अभ्यास, शिस्त आणि समाजाभिमुख दृष्टीकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर अॅड. पारिजात पांडे यांच्या हस्ते अधिवक्ता परिषद, रत्नागिरी जिल्हा यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करून अधिवक्ता परिषदेचे कार्य जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हा सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर, भाऊ शेट्ये, अजित वायकुळ, विजय झाडगावकर, असीमा नलावडे, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा सचिव समीर आठल्ये, तसेच अलिबाग येथील ज्येष्ठ अधिवक्ता श्रीराम ठोसर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात अधिवक्ता परिषदेच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीला शुभेच्छा देत, संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे वाढविणे, नवोदित वकिलांना मार्गदर्शन करणे आणि समाजाभिमुख विधी उपक्रमांना प्राधान्य देण्याबाबत मोलाच्या सूचना केल्या. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अधिवक्ता परिषदेच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, विधी क्षेत्रातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




