राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्याच्या विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. कार्यसम्राट आमदार किरण तथा भैय्या सामंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असून, यामुळे अर्जुना प्रकल्प परिसरातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती आणि अर्जुना नदीवरील पाचल-तळवडे गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या उभारणीनंतर, प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली होती. कालवे आणि वितरण व्यवस्था यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले होते, ज्याचा फटका स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत होता. वाहतुकीसाठी होणारी ही अडचण दूर करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून विशेष निधीची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, अर्जुना प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालवा परिसरातील पांगरी, करक, कारवली, पाचल, तळवडे, रायपाटण, हरळ, विलवडे, रिंगणे, आरगाव आणि परुळे या ११ गावांमधील सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे गावांमधील अंतर्गत संपर्क सुधारण्यास मदत होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्यांची बऱ्याच काळापासून असणारी गैरसोय दूर होणार आहे.
याशिवाय, पावसाळ्यात अर्जुना नदीला पूर आल्यावर पाचल आणि तळवडे या गावांमधील संपर्क वारंवार तुटत असे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता. येथे एका सुरक्षित आणि कायमस्वरूपी पुलाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीची दखल घेत, पाचल-तळवडे गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जलसंपदा विभागामार्फत ‘विशेष बाब’ म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी आमदार किरण सामंत यांनी शासन स्तरावर सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनीही वेळोवेळी या कामांची मागणी केली होती.
या विकासकामामांमुळे अर्जुना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यास मोठी मदत मिळणार आहे. तसेच नवीन पुलामुळे पावसाळ्यातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार किरण सामंत यांचे आभार मानले असून, मंजूर झालेली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे.




