रत्नागिरी : प्रतिनिधी
‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून चकचकीत करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाची सुरक्षितता उघड्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ‘न्याती’ या कंत्राटदार कंपनीला या स्थानकाच्या पुनर्विकास आणि सुशोभीकरणाचे काम देण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, सोमवारी या सुशोभित भागाचे छत (सिलिंग) अचानक पत्त्यासारखे कोसळल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे छत कोसळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी उद्घाटनापूर्वीही एकदा हे छत अशाच प्रकारे कोसळले होते. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा छत कोसळल्यामुळे कंत्राटदार कंपनीच्या ‘डुप्लिकेट’ कामाची ख्याती आता समोर आली आहे.

‘न्याती’ कंपनीला काळ्या यादीत टाका! : एकदा दुर्घटना घडूनही ढिम्म प्रशासनाने आणि कंत्राटदाराने त्याकडे डोळेझाक केल्यामुळे, प्रशासनाचा कंत्राटदारावर वरदहस्त असल्याचा संशय बळावला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.परिसरात विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांचा पुरता बोजवारा उडवणाऱ्या ‘न्याती’ कंत्राटदार कंपनीला तातडीने ‘ब्लॅक लिस्ट’ (काळ्या यादीत) करण्याची मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे. रेल्वे स्थानकाचे सिलिंग दोनदा कोसळल्याने या कंपनीच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला असून, अशा बेजबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक सूर रत्नागिरीकरांमधून उमटत आहे.
कोकणात दरवर्षी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज आणि येथील भौगोलिक परिस्थितीची पूर्ण जाणीव असतानाही, अत्यंत निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे हे काम करण्यात आल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. पहिल्या दुर्घटनेनंतर कंत्राटदार आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. केवळ वरवरची मलमपट्टी करून काम उरकण्यात आल्यामुळेच आज दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून, हा प्रवाशांच्या जीवाशी चाललेला थेट खेळ आहे. सोमवारी ज्यावेळी सिलिंगचा मोठा भाग अचानक खाली आला, त्यावेळी सुदैवाने तिथे प्रवाशांची गर्दी नव्हती. केवळ नशिबाची साथ म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही व कोणीही जखमी झाले नाही. मात्र, रेल्वे स्थानक हे २४ तास गजबजलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने, एखादी गाडी आल्याच्या वेळी ही घटना घडली असती तर याला जबाबदार कोण राहिले असते, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. एकदा दुर्घटना घडूनही ढिम्म प्रशासनाने आणि कंत्राटदाराने त्याकडे डोळेझाक केल्यामुळे, प्रशासनाचा कंत्राटदारावर वरदहस्त असल्याचा संशय बळावला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.




