रत्नागिरी : प्रतिनिधी
पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांत अवैध गावठी दारूच्या धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याऐवजी स्थानिक पोलिसांकडून अर्थपूर्ण डोळेझाक केली जात असल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांमधून केला जात आहे. पोलिसांच्या या कथित अभयामुळेच हद्दीतील तळीरामांची चांदी झाली असून सामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वरिष्ठ पातळीवरून किंवा इतर यंत्रणांकडून जेव्हा या अवैध दारू अड्ड्यांवर धाड टाकण्याचे नियोजन केले जाते, तेव्हा स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांकडून संबंधित दारूधंदेवाल्यांना आधीच ‘टिप’ (पूर्वसूचना) दिली जाते.पोलिस गाडी ठाण्यातून निघण्यापूर्वी किंवा हद्दीत पोहोचण्याआधीच दारू विक्रेत्यांना फोनवरून सतर्क केले जाते. परिणामी, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिथे केवळ रिकाम्या बाटल्या आणि शांतता पाहायला मिळते. ही केवळ एक औपचारिकता म्हणून दाखवली जाणारी कारवाई ठरत आहे.
हद्दीत राजरोसपणे सुरू असणाऱ्या या धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी अर्थपूर्ण गरमागर्मी होत असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. खाकी वर्दीच्या याच कथित पाठिंब्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला हे अड्डे राजरोसपणे चालवले जात आहेत. या अवैध दारू धंद्यांमुळे पूर्णगड पोलीस हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, परिसरात चोऱ्या आणि हाणामाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने, आता नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडू लागला आहे.
स्थानिक पोलिस प्रशासनाचे या अवैध धंद्यांशी असलेले ‘अर्थपूर्ण’ सूत आता उघड गुपित झाले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून, पूर्णगड हद्दीतील दारूअड्डे उद्ध्वस्त करावेत आणि दारूधंदेवाल्यांना टिप देणाऱ्या त्या ‘ब्लॅक शीप’ (फितूर) पोलिस कर्मचाऱ्यांवर कडक विभागीय कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




