रायगड : प्रतिनिधी
यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणारा आणि सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही दाहीदिशा फिरवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी झालेला ‘राज्याभिषेक’ हा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन मानला जातो. या ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षणाची स्मृती सदैव राहावी, या हेतूने प्रतिवर्षी दुर्गराज रायगडावर भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ आणि ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यंदा ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. हा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व शिवभक्तांनी दुर्गराज रायगडावर उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड उपाध्यक्षा सौ. चैत्राली चेतन कारेकर, उपाध्यक्ष सत्यजीत भोसले, राहुल पाटील, मेहुल पुण्यार्थी यांनी केले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर दुपारी ४:०० वाजता नाणे दरवाजा येथे युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत केले जाईल आणि तिथून ते शिवभक्तांच्या समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ करतील. दुपारी ४:१५ वाजता नगारखाना येथे समिती आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत गडपूजन पार पडेल. दुपारी ४:३० वाजता होळीचा माळ येथे युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते ‘धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची’ या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे उद्घाटन होईल. यानंतर सायंकाळी ७:०० वाजता ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके आणि वारकरी संप्रदायाकडून टाळ-मृदंगाचा गजर केला जाईल. रात्री ८:०० वाजता राजसदरेवर ‘जागर शिवशाहिरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहिरी कार्यक्रम रंगणार असून, रात्री ९:०० वाजता शिरकाई मंदिरात गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ आणि रात्री ९:३० वाजता अगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ६ जून २०२६ या मुख्य सोहळ्याच्या दिवशी सकाळी ७:०० वाजता युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात नगारखाना येथे ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात येईल. यानंतर सकाळी ७:३० वाजता राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम होईल आणि सकाळी ९:३० वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होईल. सकाळी ९:५० वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन झाल्यानंतर सकाळी १०:०० वाजता मुख्य सोहळ्यास प्रारंभ होईल. यावेळी युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक आणि राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जाईल. सकाळी १०:२० वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज शिवभक्तांना संबोधित करतील. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक’ पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल. सकाळी ११:०० वाजता आणि त्यानंतर दुपारी १२:०० वाजता ही पालखी जगदीश्वर मंदिर येथे पोहोचेल. दुपारी १२:१५ वाजता जगदीश्वर मंदिर येथे युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला जाईल आणि शेवटी दुपारी १२:२५ वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून या अभूतपूर्व सोहळ्याची सांगता होईल.या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व शिवभक्तांनी दुर्गराज रायगडावर उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड उपाध्यक्षा सौ. चैत्राली चेतन कारेकर, उपाध्यक्ष सत्यजीत भोसले, राहुल पाटील, मेहुल पुण्यार्थी यांनी केले आहे.




