रत्नागिरी : प्रतिनिधी
प्रशासकीय पारदर्शकता आणि कामाचा वेग यांचा आदर्श वस्तुपाठ घालत रत्नागिरी नगरपालिकेने राज्यस्तरावर सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ अभियानात १०० टक्के गुणांसह राज्यात अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने प्रशासकीय कामांमधील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ६ मे २०२५ पासून हे अभियान राबवले होते. पूरस्थितीमुळे या मोहिमेला १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या काळात श्री. गारवे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगरपालिकेने मूल्यमापनाच्या सर्व निकषांवर ८० पैकी ८० गुण मिळवून १०० टक्के यशाची नोंद केली.मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपालिकेच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
यशाचे प्रमुख खांब ⤵️
- प्रशासकीय सुसूत्रता: कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया आणि बिंदू नामावलीचे (Roaster) प्रमाणीकरण वेळेत पूर्ण केले.
- संवेदनशीलता: प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या १०० टक्के अनुकंपा नियुक्त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आधार दिला.
- डिजिटल क्रांती : केंद्राच्या ‘iGOT’ प्लॅटफॉर्मवर सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले.
- अद्ययावत सेवापुस्तके: सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके (Service Books) आणि आस्थापना विषयक बाबी पारदर्शकपणे अद्ययावत केल्या.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी नगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून आणि प्रशासकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा गौरव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




