राजापूर : प्रतिनिधी
राजापुरातील त्या पुरातन वास्तुबाबत विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगर विकास विभागाकडून राज्याचा मंत्री म्हणून आपण राजापुरातील चिंचबांध येथील ती पुरातन वास्तु हे सुर्यमंदिर नाही असे सभागृहात उत्तर दिलेले आहे.. याबाबत दिल्ली पुरातत्व विभाग व राजापूर नगर परिषद प्रशासनाकडून आपल्याकडे आलेल्या अहवालाच्या आधावर आपण ती माहिती सभागृहात दिली आहे व ती रेकॉर्डवरही उपलब्ध आहे. मात्र या विधानाबाबत विपर्यास करून व फेक नरेटीव्ह पसरवून नाहक आपल्याला टार्गेट करण्याचा बदनामी करण्याचा प्रयत्न काहींनी केला. मी देखील एक हिंदू आहे व मलाही माझ्या धर्माचा अभिमान आहे, मात्र अशा प्रकारे आपल्या विधानाचा विपर्यास करून समाजात नाहक गैरसमज पसरविण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राजापुरात पत्रकार परिषद दिली.
आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून विपर्यास करण्यापुर्वी व आपल्या निषेधाचा ठराव करण्यापुर्वी संबधितांनी आपल्याशी चर्चा केली असती तर आपण नक्कीच योग्य माहिती देऊन त्यांचे समाधान केले असते असेही ना. सामंत यांनी यावेळी नमुद केले. ही पुरातन वास्तु सुर्यमंदिर आहे का? याबाबत प्रत्यक्ष पहाणी करून संशोधन करण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित गठीत करण्यात येत असल्याची घोषणा करून या समितीने १० ऑक्टोबरपर्यंत आपल्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. या समितीच्या अहवालात जर ते सुर्यमंदिर असल्याचे सिध्द झाले तर नक्कीच ते हिंदूचे असेल यात कोणालाही शंका असण्याचे कारण नाही असेही ना. सामंत यांनी सांगितले.
राजापूर शहरातील चिंचबांध येथील पुरातन वास्तुबाबत वाद निर्माण झाला आहे. सदरची वास्तु ही पुरातन सुर्यमंदिर असल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी राजापुरात धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेत सदरचे मंदिर सुर्यमंदिरच असल्याचे नमुद करत ते ताब्यात घेण्याचा निर्धार करण्यात आला. तर पालकमंत्र्यानी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या निषेधाचा ठरावही या सभेत करण्यात आला.यावर शनिवारी राजापुरात येत ना. सामंत यांनी प्रशासकिय अधिकारी यांची बैठक घेतली व त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेते विस्तृत भूमिका मांडली.
विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षधेधीला उत्तर देताना नगर विकास विभागाकडून राज्याचा मंत्री म्हणून आपण राजापुरातील चिंचबांध येथील ती पुरातन वास्तु हे सुर्यमंदिर नाही असे उत्तरात नमुद केलेले आहे. याबाबत दिल्ली पुरातत्व विभागाकडून व राजापूर नगर परिषद प्रशासनाकडून आपल्याकडे आलेल्या अहवालाच्या आधावर आपण ती माहिती सभागृहात दिली आहे व ती रेकॉर्डवरही उपलब्ध आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सुर्यमंदिर असल्याची नोंद आढळून येत नाही असा अहवाल या दोन्ही विभागांनी दिला आहे असे ना. सामंत यांनी सागितले. तर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मी हे उत्तर दिलेले नाही तर राज्य शासनाचा प्रतिनिधी व मंत्री म्हणून हे उत्तर दिलेले आहे. यावेळी मी पुरातन वास्तु असा उलेख केला असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. मात्र या विधानाबाबत व उत्तराबाबत योग्य माहिती न घेता त्याचा विपर्यास करू नाहक आपली बदनामी करण्याचा आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न काहींनी केला हे दुदैव असल्याचे त्यांनी नमुद केले.
राज्याचा मंत्री म्हणून व शासनाचा प्रतिनिधी म्हणून जे बोलतो, सांगतो ती राज्य शासनाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या विषयाबाबत राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपण माहिती दिलेली आहे असेही ना. सामंत यांनी नमुद केले. माझ्याशी चर्चा केली असती तर मोर्चा कोणाविरोधात करायचा निषेध कोणाचा करायचा हे मी निषेध करणाऱ्यांना जरूय सांगितले असते असा टोलाही ना. सामंत यांनी लगावला.
शुक्रवारी झालेल्या हिंदू धर्मसभेत आपल्या निषेधाचा ठरावही पारित करण्यात आल्याचे आपल्याला समजले. या ठरावाचे अनुमोदक म्हणून ग्वाही दक्षिण पीठ नाणीजधामचे जगतगुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्य व अनुमोदक म्हणून अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची नावे टाकण्यात आलेली आहे. मात्र याबाबत या दोघांना कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले असेही ना. सामंत यांनी यावेळी नमुद केले. आ. जगताप यांच्याशी आपण चर्चा केली त्यावेळी त्यांनी याबाबत आपणला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले व रामानंदचार्य नरेंद्राचार्य यांनीही हेच सांगितले असेही ना. सामंत यांनी नमुद केले. मात्र काहींना नाहक आपली बदनामी करण्यात फेक नरेटीव्ह पसविण्यात आनंद वाटत असेल तर त्यात माझा काय दोष असा सवालाही ना. सामंत यांनी उपस्थित केला.
ती पुरातन वास्तु सुर्यमंदिर आहे का? याबाबत प्रत्यक्ष पहाणी करून संशोधन करण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित गठीत करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी ना. सामंत यांनी केली. या समितीत, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांसह पुरातत्व विभागाचे संचालक, सहाय्यक संचालक, यांसह प्राताधिकारी ठरवतील ते सकल हिंदू समाजाचे दोन व मुस्लीम समाजाचे वक्फ बोर्डाशी संबधित दोन प्रतिनिधी या समितीत असतील असेही ना. सामंत यांनी नमुद केली. ही समीत प्रत्यक्ष पहाणी करेल, पुरावे शोधेल व या समितीकडून १० ऑक्टोबर पर्यंत अहवाल घेतला जाईल जर त्यात सुर्यमंदिर आहे हे सिध्द झाले तर त्याला कोणाची हरकत असण्याचा प्रश्नच नाही असेही ना. सामंत यांनी नमुद केले. मात्र यावर राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही असेही त्यांनी सांगितले.
मी देखील हिंदू आहे, माझे आई वडीलही हिंदू आहेत, त्यामुळे आंम्हालाही धर्माचा अभिमान आहे. गो मातेला राजमातेचा दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला त्यातही आपली भूमिका होती, रत्नागिरीत धर्मविर संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यातही आपला पुढाकार आहे, राजापुरातील श्री देव धुतपापेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार आमदार किरण सामंत यांच्या पुढाकाराने होत आहे, कशेळीतील कनकादित्य मंदिराच्या सुशोभिकरणासाठी ७५ लाखाचा निधी आ. किरण सामंत यांनी उपलब्ध केला आहे. तर गंगा तीर्थ विकासासाठीही एक कोटी रूपये निधी आपण दिला आहे. गंगातिर्थ विकास कामात जो अडथळा येत आहे तो दूर करण्यासाठी जर का अशा मंडळींनी प्रयत्न केले असते तर ते चांगले झाले असते त्यामुळे आपल्याला कुणी हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही असे नमुद करत या विषयात केवळ मला टार्गेट करण्याचा आणि फेक नरेटीव्ह पसरविण्याचा अजेंटा काही मंडळी राबवित आहेत असेही ना. सामंत म्हणाले.राजापूर तालुक्यातील कशेळी गावात ऐतिहासिक सुर्य मंदिर आहे. भारतात हे महत्वपुर्ण असे सुर्यमंदिर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित असलेल्या सौर उर्जा प्रकल्पांतर्गत हे संपुर्ण गाव सौरउर्जेवर केले जाणार असल्याची माहिती यावेळी ना. सामंत यांनी दिली.
राजापुरात ना. सामंत यांचे शासकिय विश्राम गृहावर आ. किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, हनिफ मुसा काझी, एड. शशिकांत सुतार, एड. यशवंत कावतकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.




