लांजा : प्रतिनिधी
लांजा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत सोमवार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) येथे “जनता दरबार” पार पडला. लांजा समन्वय समितीच्या मागणीवरून आयोजित या बैठकीत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार निर्मिती, विकास आराखडा, भूमी अभिलेख, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, वाहतूक अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तात्काळ निर्णय आणि तात्काळ कार्यवाही हे या दरबाराचे वैशिष्टय होते. अर्थात आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार याचा प्रत्यय येथे प्रत्येकाला येत होता.
जनतेच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील समन्वय वाढवून तातडीने निराकरण करणे हाच उद्देश आहे. माझ्याकडे समस्या घेऊन आलेला व्यक्ती विरोधक असला तरी त्याचे काम मी नक्की करून देतो. युवकांना रोजगार मिळावा म्हणून एमआयडीसी प्रकल्प व विविध उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्याचे उद्योगमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे.
– आ. किरण तथा भैय्या सामंत
जनता दरबारात नागरिकांनी पाणीटंचाई, भूमी अभिलेखातील रखडलेली कामे, विकास आराखड्यातील हरकती, घरापर्यंत रस्ता नसणे, दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे, स्ट्रीट लाईट बंद असणे, डम्पिंग ग्राउंड, ड्रेनेज अभाव, पशुवैद्यकीय विभागातील अडचणी, बससेवा सुधारणा, प्रभाग रचना, धोकादायक पूल, अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशातील विलंब अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला. काही विषयांवर आमदार सामंत यांनी तत्काळ निर्णय घेत आदेशही दिले.
गणेशोत्सवाच्या नियोजनाविषयीही यावेळी विशेष चर्चा झाली. कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले, नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, सहाय्यक नगरचनाकार स्मिता कलगुटकी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे श्रीकुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.जनता दरबाराला शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.




