रत्नागिरी : प्रतिनिधी
गंगा मातेच्या पवित्र पावन भूमीतील एका सहकारी बँकेत तब्बल ६८ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ संचालक मंडळच थेट सामील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संचालकांनी विश्वासाचा गैरवापर करून विविध बनावट कर्ज प्रस्ताव, फर्जी खाती आणि कागदपत्रांद्वारे कोट्यवधी रुपये अपहार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात एका व्यवस्थापकावर कारवाई केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात संचालक मोकाट असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे पुढे आले आहे.
अचानक या प्रचंड आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर खातेदारांमध्ये प्रचंड चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक खातेदारांची ठेव रक्कम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांची मोठी गर्दी उसळली असून, आपली रक्कम सुरक्षित आहे का याची खात्री करण्यासाठी ते वारंवार बँकेशी संपर्क साधत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता आणि नियमनावरील प्रश्न ऐरणीवर आले आहेत. खातेदार आता सरकार आणि प्रशासनाकडे आपली रक्कम परत मिळवून देण्यासाठी मागणी करत आहेत.




