रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यात वाटद एमआयडीसी शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू असताना नांदिवडे गावचे माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे यांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. जिंदाल कंपनीने आश्वासन देत लोकांची फसवणूक करत आपले हातपाय पसरले आणि आज जयगड परिसर भकास झाला तशीच वाटदची होईल. म्हणून सावधान रहा, असा सल्ला माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे यांनी दिला आहे.
जिंदाल कंपनीचे अधिकारी व नेते मंडळींनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. की नांदिवडे व जयगड परिसराचे आम्ही कॅलिफोर्निया करू. पण गेल्या १५ ते २० वर्षात कॅलिफोर्निया सोडाच, लोक जिंदाल कंपनीच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून शहरांत चालले आहेत. ही मोठी शोकांतिका आहे. पोलाद उद्योग आणणार होते, पण औष्णिक विद्युत प्रकल्प आणला आणि आता गॅस टर्मिनल आणण्याचा प्रयत्न करत आहेत. गॅस टर्मिनल लोकवस्तीत होऊ नये म्हणून लोक जिवाचं रान करत आहेत, असे सुर्वे म्हणाले, घरपट्टी प्रत्येक कुटुंबात नोकऱ्या देतो सांगून फसवले. कंपनीने सांगितले होते की, पायवाटा बंद करणार नाही. परंतु पायवाटा बंद केल्या आहेत.
जिंदाल कंपनीने सांगितले होते गावात सुसज्ज रुग्णालय उभारू, पण रुग्णालय न उभारता ‘ऊर्जा’ नावाचा दवाखाना सुरू करून लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली, असा आरोप सुर्वे यांनी केला आहे. कंपनीने सांगितले होते, गावात उच्च शिक्षणाची सोय करू. केली नाही. चार कोसावर जिंदाल विद्या मंदिर (इंग्रजी माध्यम) उभारले. वर्षाला विद्यार्थ्यांकडून सुमारे ३० ते ५० हजार फी आकारली जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कंपनीने प्रदूषण होणार नाही सांगितले. मात्र आज परिसात प्रचंड प्रदूषण होत असल्याचा आरोप गुरुनाथ सुर्वे यांनी केला आहे. सांडपाणी नांदिवडे किनारी भागात सोडले. मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण हवेच्या माध्यमातून राखेचे व कोळशाचे कण असनावाटे पोटात, फळबागांवर जात आहेत.जिंदाल कंपनी असलेल्या गावात अजूनही काही वाडीत टँकरने पाणी दिले जातेय. एकदाच चांगले पाण्याचे नियोजन का केले जात नाही, ही अशोभनीय बाब आहे.
या आश्वासनाप्रमाणे वाटद औद्योगिक प्रकल्पाचीही अवस्था हीच होणार आहे. सांगणार एक करणार दोन. त्यापेक्षा वाटद, गडनरळ, कोळीसरे, कळझोन्डी परिसरात मोठ्या प्रमाणात मसाल्याची झाडे लावावीत व त्यावर प्रकिया करून विविध पदार्थचे उद्योग उभरावेत. नाहीतर आंबा, काजू, फणस प्रक्रिया उद्योग उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे.




