रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी आगाराच्या एसटी बस सेवा भंगार होत आहेत. शनिवारी रत्नागिरी – दाभीलआंबेरे मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांमधून पावसाळ्यात छतातून थेट पावसाचे पाणी गळत होते. त्यामुळे प्रवाशांची अवस्था कोंडवाड्यातल्या कैद्यासारखी झाली आहे. खड्डे असणारे रस्ते आणि गळक्या बसगाड्या यामुळे प्रवास म्हणजे शिक्षाच ठरू लागली आहे.
या मार्गावर धावणाऱ्या अनेक बसगाड्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की, त्या धावतातच कशा याचे आश्चर्य वाटावे. बसचे छत गळते, खिडक्यांचे काच तुटलेले, सीट फाटलेल्या, दरवाजे नीट बंदही होत नाहीत. प्रवाशांनी छत्र्या उघडून प्रवास करावा लागतो. या परिस्थितीकडे लक्ष वेधूनही एसटीचे अधिकारी एसी कॅबिनमध्ये बसून ‘कानावर हात ठेवत’ आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. लोकांनी प्रवास करावा की त्रास सहन करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मोडकळीस आलेल्या गाड्यांमध्ये ब्रेक फेल, टायर फाटणे, आणि अचानक बंद पडणे हे रोजचेच प्रकार झाले आहेत. अपघात होऊन जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? याचा कोणीच विचार करत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात, जिथे शालेय विद्यार्थी, महिलावर्ग, वृद्ध आणि रोजंदारी करणारे नागरिक एसटीवर अवलंबून आहेत, तिथे नव्या व सुरक्षित बसगाड्यांची तातडीने व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे.



