रत्नागिरी : प्रतिनिधी
शासनाने विविध कार्यालयांत तसेच सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र (ID Card) घालणे बंधनकारक केले असूनही अनेक अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र घालण्यास कुचराई करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समित्या, नगर परिषद, महापालिका, महसूल व पोलीस खात्यांसह विविध शासकीय विभागांमध्ये कर्मचारी व अधिकारी ओळखपत्राशिवाय फिरताना दिसतात. काही जण तर मुद्दाम ओळखपत्र खिशात ठेवतात, परंतु गळ्यात लावण्याचे टाळतात. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना या कर्मचाऱ्यांची ओळख पटवणे कठीण जाते. यामुळे कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्रशासकीय पारदर्शकता, सुरक्षा आणि शिस्तबद्धता या दृष्टीने ओळखपत्र लावणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही ठिकाणी अधिकारीसुद्धा आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना याबाबत सूचित करत नाहीत, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
गृह विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात वेळोवेळी आदेश निर्गमित केले असून, सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी ओळखपत्र गळ्यात लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतच्या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते, असेही आदेशात नमूद आहे.
“सरकारी कार्यालयांत कामासाठी गेलेल्या नागरिकांना नेमका कोण अधिकारी आहे आणि कोण कर्मचारी, हे ओळखणे कठीण होते. अनेकदा फसवणूक होण्याची भीती असते. त्यामुळे ओळखपत्र लावणे अनिवार्य असावे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
सद्यस्थितीत जिल्हास्तरावर किंवा तालुका पातळीवर याची कोणतीही पडताळणी अथवा तपासणी केली जात नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सक्तीने ओळखपत्र वापरण्याचे आदेश द्यावेत आणि वेळोवेळी याचे पालन होत आहे का, याची खातरजमा करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.




