रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई या गोवा महामार्गावर निवळी बावनदी परिसरात गॅस वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने खासगी मिनिबसला दिलेल्या धडकेमुळे बस दरीत कोसळली. या अपघातात २६ शिक्षक जखमी झाले असून त्यातील एकाला गंभीर इजा झाली आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड प्रशिक्षणासाठी हे शिक्षक रत्नागिरीकडे येत होते. रविवारी त्यांच्या मिनी बसला अपघात झाला. अपघाताच्या नंतर गॅसची गळती सुरू झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प होती.
या अपघातात संकेत कृष्णकांत जागुष्टे, विराज राजाराम सावंत, मंदा सुखदेव खाडे, स्मिता मधुकर पाटील, उषा अमोल खुडे, जयश्री सूर्यकांत गावडे, प्रियांका दिलीप जाधव, नेहा संतोष मेस्त्री, धर्मेंद्र दत्तात्रय देरूगडे, दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे, सुलक्षणा संभाजी पाटील, निशिकांत दीनानाथ वानरकर, रूपाली सुकांत यादव, श्वेता संजय चव्हाण, हर्षाली हेमंत पाकळे, नीता विनायक बोंद्रे, मीना सुभाष घाडगे, सोनाली हरेश सावंत, कमल किशोर महाडिक, प्रेमकुमार बबन शिवगण, अमोल गणेश कोतवाल, मनीषा संतोष कांबळे, मालिनी दीपक चव्हाण, प्रियांका जाधव, राजेश यादव, श्वेता यादव अशी जखमी शिक्षकांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर हा अपघात झाल्यानंतर सीएनजी टॅंकर जवळ असलेल्या एका गुरांच्या गोठ्यावर आणि घरावर कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने घरातील माणसे मोठा आवाज झाल्याने बाहेर पळाली. या दुर्घटनेत गुरांचा गोठा जळून खाक झाला आहे. या यामध्ये दोन गुर जखमी झाली आहेत. यामध्ये दुभत्या जनावरांचा समावेश आहे. घराजवळ उभी असलेली रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे व घरावरील फायबरचे पत्रे पेटले आहेत. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसूल, अग्निशमन दल आधी शासकीय सुरक्षा यंत्रणा दाखल आहेत. सीएनजी टँकर मधून होणारी गळती थांबवण्यात यश आलं आहे.