रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्यात पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. त्यानुसार सुरू असलेल्या गस्तीवेळी संशयास्पद हालचाली तपासण्यात येतात. शनिवारी, २६ एप्रिल रोजी, पथकाला पटवर्धनवाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्गावर उद्यमनगर येथे दोन दुचाकींवर तीन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. पोलिसांनी तत्काळ त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच अत्ताउल्ला सलिम पटेल (वय ३५, रा. उद्यमनगर), फहाद मुस्ताक पाटणकर (वय २७, रा. शिवाजीनगर), आणि आयान अजिज मुल्ला (वय २४, रा. उद्यमनगर) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या ताब्यातून ३५३ ग्रॅम गांजा, दोन दुचाकी (एमएच-०८ एटी-६७९२ व एमएच-०८ एव्ही-४६३०) आणि चार मोबाईल फोन असा एकूण २,२३,३५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, पोलीस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, अमित कदम, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये, भैरवनाथ सवाईराम, सत्यजित दरेकर आणि महिला पोलीस हवालदार वैष्णवी यादव यांच्या पथकाने केली.




