रत्नागिरी : प्रतिनिधी
भाजपा देईल ती जबाबदारी निभावणारे नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सहप्रभारी बाळासाहेब माने यांनी आतापर्यंत ३० नमो संवाद सभा घेऊन जवळपास १० हजार मतदारांशी संवाद साधला. गेल्या दहा वर्षांतील मोदी सरकारची अतुलनीय कामगिरी सांगताना राम मंदिर, मेट्रो, महामार्ग, विकसित भारताचा संकल्प अशा विविध गोष्टींवर संवाद साधत मतदारांची मतेही जाणून घेतली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता पुढील नमो संवाद सभा महायुतीच्या सभा म्हणून सुरू होणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून भाजपा महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांपासूनच बाळ माने रत्नागिरी-संगमेश्वर, चिपळूण, लांजा- राजापूर या मतदारसंघात सातत्याने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून, तळागाळात पोहोचून जनसंपर्क ठेवला आहे. त्यामुळेच बाळासाहेब रत्नागिरी विधानसभेचे क्षेत्रप्रमुख म्हणून काम पाहत असताना त्यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे सहप्रभारी म्हणून आणखी एक जबाबदारी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे ते अधिक जोमाने काम करू लागले.
गेल्या पाच दिवसांपासून माने यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून दररोज किमान ४ ते ५ नमो संवाद बैठका घेत आहेत. खेडशी येथून या सभांना प्रारंभ झाला. त्यानंतर नाचणे, मिरजोळे, कुवारबाव, जाकिमिऱ्या, शिरगाव, बसणी, कोतवडे, वाटद खंडाळा, गणपतीपुळे, पोचरी, यासह रत्नागिरी शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये नमो संवाद सभांना उदंड प्रतिसाद मिळाला. माने यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा व प्रदेश पदाधिकारी यांच्यासमवेत बाबासाहेब परुळेकर, दीपक पटवर्धन, सुजाता साळवी, शिल्पा मराठे, प्राजक्ता रुमडे, सतीश शेवडे, सतेज नलावडे, ओंकार फडके, सुशांत पाटकर, नाना शिंदे, बापू गवाणकर, भाऊ शेट्ये, अशोक मयेकर, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, उमेश देसाई व सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या सभा यशस्वी केल्या आहेत. आता उमेदवार जाहीर झाल्यामुळे महायुतीच्या एकत्रित सभा घेण्यात येणार आहे. याकरिता नियोजन करण्यात आल्याची माहिती माने यांनी दिली.




