राजापूर : प्रतिनिधी
शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २६ जानेवारीपासून सुरू केलेले आमरण साखळी उपोषण मंगळवाली सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. या उपोषणाला धोपेश्वर गावाबरोबरच या पंचक्रोशीसह तालुक्यातुन आता वाढता पाठींबा मिळू लागला आहे.
मंगळवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजापुरात येत उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व उपोषणात सहभागी होत अनधिकृत मदरशावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. भाजपा पुर्णपणे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत सावंत यांनी दिली. यानंतर त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन यावर तातडीने तोडगा काढावा व अनधिकृत मदरसा बंद करावा अशी मागणीही केली आहे.
प्रशासनावर कोणाचा दबाव?
अनाधिकृत मदरशासारख्या संवेदनशिल विषयावर आमरण साखळी उपोषण सुरू असतानाही स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने लक्ष घालुन कोणताही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करतेय काय? असा सवाल आता उपोषणकर्त्यांसह राजापूरवासीयांतुन उपस्थित केला जात आहे.
पन्हळेतर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत, तसेच धार्मिक तेढ वाढविणारा विषय असून सदरहू मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थानी यापुर्वीच केलेली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्याने व अनधिकृत मदरशावर कारवाई न केल्याने रविवार दि. २६ जानेवारी २०२५ पासून अमोल सोगम यांसह स्थानिक ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरु करण्यात केले आहे.
रविवारपासून सुरू झालेल्या या आमरण साखळी उपोषणात स्थानिक ग्रामस्थांसह अमोल सोगम,पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर आदीसंसह स्थानिक ग्रामस्थ व महिलावर्गही मोठया संख्येने सहभागी झाला आहे. भाजपासह शिवसेना उबाठा या पक्षांनीही या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उपोषणस्थळी हजेरी लावत उपोषणात सहभाग घेतला.
मंगळवारी तिसऱ्या दिवशी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे, आम्ही अनधिकृत बाबी खपवून घेणार नाही असा इशारा देत भाजपाच्या राज्यात आम्हाला अनधिकृत मदरशा विरोधात आंदोलन व उपोषण करावे लागत आहे याची खंत असल्याचे नमुद केले. भाजपा पुर्णपणे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मंगळवारी उपोषणस्थळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ.सुयोगा जठार, मोहन घुमे, कोषाध्यक्ष विवेक गुरव, संदेश विचारे, शिवसेनेचे रवींद्र बावधकर, शिवसेना उ. बा. ठाकरे गटाचे तालुका प्रमुख कमलाकर गुरव, संदीप चव्हाण, अनिल कुडाळी यांसह हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, निकेश पांचाळ विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दिलीप गोखले आदिसह रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले होते.
या उपोषणाला धोपेश्वर गावातील स्थानिक ग्रामस्थांसह मंगळवारी या पंचक्रोशीतील अनेक गावांतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपला पाठींबा दर्शविला. तर आता राजापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांतुनही विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटना यांनीही या उपोषणाला पाठींबा देण्याचा निर्धार करत हे उपोषण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.



