रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीमध्ये हिंदू समाज राहतो याचा प्रशासनाला विसर पडला आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाला इथले प्रशासन वेगवेगळे नियम लावते आहे. अनधिकृत बांधकामबाबत आजपर्यंत अनेक निवेदने, मोर्चा आणि आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु आता प्रशासनाकडून आम्हाला ही बांधकाम हटवण्याची तारीख हवी आहे, जर यावेळी ही प्रशासन गंभीर झालं नाही तर मात्र रत्नागिरीतील हिंदू समाज तिसरा डोळा उघडेल आणि त्यानंतर होणाऱ्या तांडवाला इथलं प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशारा हिंदुत्वनिष्ठ आ. नितेश राणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोहत्या आणि गोमांस विक्रीचा प्रकार सुरू आहेत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी गोहत्या बंदी कायदा लागू केला आहे, असं असतानाही इथे गोहत्या होत असेल आणि काही अधिकाऱ्यांमुळे गृहखात्याची बदनामी होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असेही आ. राणे यांनी स्पष्ट केले. जिथे जिथे हिंदू समाज आपला आवाज उठवेल तिथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चित उपस्थित असणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी आ. नितेश राणे यांनी रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली. या वेळेला विविध प्रश्नांवर त्यांची चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. नितेश राणे म्हणाले रत्नागिरीमध्ये हिंदू समाज सुद्धा राहतो याचा प्रशासनाला विसर पडला आहे. रत्नागिरीत अनेक अनधिकृत बांधकाम आहेत, लोकमान्य टिळक मेमोरियल या शासकीय इमारतीच्या आवारात अनधिकृत मजार बांधण्यात आली आहे. इथल्या किल्ल्यावरती सुद्धा अनधिकृत बांधकाम आहेत. मात्र ती हटवली जात नाहीत त्या उलट इथल्या हिंदू समाजातल्या एखाद्यानं शासकीय जागेवर साधी टपरी जरी बांधली तरीही दहाव्या मिनिटाला कारवाई होत असते मग जो नियम प्रशासन मुसलमान समाजाला लावतो तोच नियम हिंदू समाजाला इथले प्रशासन का लावत नाही? आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान मानतो, अद्यापही रत्नागिरीत शरियत कायदा लागू झालेला नाही मग इथले प्रशासन नेमके काय करते आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रत्नागिरीतील या अनधिकृत बांधकामांबाबत आजवर हिंदू समाजाकडून निवेदने, मोर्चे, आंदोलन करण्यात आली आहेत. असं असून सुद्धा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. मात्र आज आम्ही हा शेवटचा इशारा देत आहोत. आता ही अनधिकृत बांधकामे केव्हा हटवली जाणार त्याची तारीख प्रशासनांने आम्हाला द्यावी, अन्यथा इथला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि त्यानंतर होणाऱ्या तांडवाला इथलं प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशारा आ. नितेश राणे यांनी दिला आहे.




