रत्नागिरी : प्रतिनिधी
बस सेवेचे बिघडलेले वेळापत्रक सुधारा आणि विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासापासून मुक्त करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगार व्यवस्थापकांची भेट घेण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
कुरतडे -चांदेराई-लाजूळ यासह ग्रामीण भागातील एकंदरित बिघडलेल्या सर्वच ठिकाणच्या वेळापत्रकामुळे होणाऱ्या गैरसोयीचा पाढा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून वाचण्यात आला. याबाबतीत बिघडलेल्या वेळापत्रकात लवकरात लवकर सुधारणा करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार व कामगार वर्गाला होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात यावा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यानंतर सकारात्मक बदल न दिसल्यास मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. यावेळी मनसे राज्य परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनील साळवी, मनसे रत्नागिरी शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, शाखाध्यक्ष मार्विक नारकर हे महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.




