रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यातील १९३ एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ६०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. ३ कोटी ३४ लाख रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात आलेल्या पाली बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांसह सर्वांचीच आहे, त्याचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पाली येथील एसटी बसस्थानकाचे लोकार्पण फित कापून आणि कोनशिला अनावरण करुन पालकमंत्री सामंत यांनी आज केले. याप्रसंगी सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष घाडगे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, बाबू म्हाप, विनया गावडे, गोकुळचे संचालक मुर्लीधर जाधव, कांचन नागवेकर आदी उपस्थित होते.
ना. सामंत म्हणाले, जिल्ह्यातील रत्नागिरी, जाकादेवी, पावस, लांजा, गणपतीपुळे आदी बसस्थानकांच्या विकासासाठी एमआयडीसीकडून ८० कोटी मंजूर केले आहेत. अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम केले आहे. गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यामधील बसस्थानकांच्या सुशोभिकरणासाठी १० कोटी देण्यात आले आहेत. दररोज ३५ ते ४० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. पालीमधील सुसज्ज एसटी बसस्थानकांमधील उपहारगृहात कमी दरात चांगले पदार्थ द्यायची सोय परिवहन महामंडळाने केली पाहिजे. बसस्थानकावरील हिरकणी कक्ष वातानुकुलित करण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानके स्वच्छतागृहे, स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पाली हे गाव विकासातील आदर्श मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने दिलेल्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.




