निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर यांचा पोटशुळी नेत्यांना इशारा
रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकणचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांनी मंजूर केलेल्या निवळी येथील वीज वाहिनी कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले. त्यामुळे याबद्दल कोणाला पोटशूळ उठला असेल तर आम्ही त्यावर उपाय करायला सज्ज आहोत, असा इशारा या कामाचा पाठपुरावा करणारे निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर यांनी दिला आहे. आमच्या कामाचे भूमिपूजन आम्ही केले असून कोणी जर श्रेय घेण्यासाठी धडपड करत असेल, तर तो प्रयत्न हाणून पाडू, जनता सब जानती है, राणे साहेबांनी काम मंजूर केले आणि निवळी गावाची वीज समस्या मिटणार आहे. हे ज्यांना बघवत नाही, त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, गाठ आमच्याशी आहे. असेही निवळकर म्हणाले.
नारायणराव राणे निवडून आल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील पाहिलं भूमिपूजन त्यांनी निवळी येथे केले आहे. त्यामुळे निवळीचा रवळनाथ सदैव त्यांच्या पाठीशी राहील. अश्याच कामाच्या जोरावर आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयाचा अश्वमेध दिसेल असेही निवळकर म्हणाले. निवळी गावातील जनता आपल्या पाठीशी आहे. ज्यांना स्वतःच्या घरात किंमत नाहीं त्याला घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची किंमत ओळखून त्यांच्या जीवावर उड्या माराव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.

निवळी गावातील नदीकिनारी असणाऱ्या वाड्यांमध्ये पावसाळ्यात कायम वीज पुरवठा खंडित होतो. रत्नागिरी तालुक्यात निवळी गाव असताना संगमेश्वर तालुक्यातून वीज देण्यात येत होती. त्यामुळे पावसाळ्यात नदीकिनारी असणाऱ्या गावात अंधार पसरायचा. २०१७ पासून यावर तोडगा काढून गावाची समस्या मिटवावी, यासाठी मी स्वतः ग्रामस्थांना घेऊन पाठपुरावा केला. मात्र कोणत्याही आमदार, खासदारांनी याकडे लक्ष दिले नाही. खा. नारायणराव राणे निवडून आल्यावर त्यांनी एका फोनवर हे काम मंजूर केले. त्यांच्या नव्याने सुरू झालेल्या कार्यकाळातील हे पहिलेच काम असून ते त्यांच्यामुळे होत आहे. त्यामुळे काही पोटशूळ विकारी नेत्यांनी दुसऱ्याच्या मुलाचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला निवळकर यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दिला आहे. आगामी काळात राणे साहेबांच्या नेतृत्वात गावच्या विकासाचे पर्व सुरू होईल, असेही निवळकर यांनी सांगितले.




