बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवातर्फे मागणी, सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर खंडपीठ करण्यात यावे, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या दिनांक १६ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारणसभेत एकमताने असा ठराव पारित करण्यात आला आहे. या मागणीचे पत्र मुख्य न्यायमूर्ती आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मराठवाडा खंडपीठ हे औरंगाबाद येथे स्थापन झाल्यामुळे त्या खंडपीठाचे नामकरण औरंगाबाद खंडपीठ असे झाले होते. परंतु दरम्यानच्या काळात औरगाबाद या शहराचे व जिल्ह्याचे व महसूल विभागाचे नाव औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्याला अनुसरुन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या दिनांक १६ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारणसभेत एकमताने असा ठराव पारित करण्यात आलेला आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर खंडपीठ’असे करण्यात यावे व संबोधण्यात यावे. तसेच याबाबतच्या नावातील बदल करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही जलद गतीने करण्याचे दिशानिर्देंश संबंधिताना देण्यात येवून अशा प्रकारचे नामबदल करण्यात यावा,अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केली आहे. या मागणीचे पत्र मुख्य न्यायमूर्ती आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. या पत्रावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे यांची स्वाक्षरी आहे. बार कौन्सिलच्या या मागणीचे सर्व स्तरातून समर्थन होत आहे.





