कणकवली: प्रतिनिधी
भाजप नेहमी विकासाचे राजकारण करते. पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे ते महायुतीच्या सरकारविरूद्ध संविधान बदलण्याचा, आरक्षण संपविण्याचा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास निवडणूक निरीक्षक म्हणून गेलेले भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कणकवली येथील प्रहार भवनात दि.०२ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.
यावेळी भाजपचे व महायुतीमधील घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खा.नेते म्हणाले, मोदी सरकारने १० वर्षात अनेक कल्याणकारी योजना आणून ऐतिहासिक निर्णय घेतले. हे सरकार सर्व समाजघटकांच्या सोबत आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम करत आहे. देशाच्या सर्वोच अशा राष्ट्रपतीपदावर मुस्लिम समाजातून डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम, दलित समाजातून रामनाथ कोविंद, आदिवासी समाजातून द्रोपदी मुर्मू यांना विराजमान करण्याचे काम भाजपच्याच नेतृत्वातील सरकारने केले आहे. जे काँग्रेस सरकारला कित्येक वर्षात जमले नाही ते भाजप सरकारने करून दाखविले. एवढेच नाही तर काश्मीरमधील कलम ३७०हटवणे, तीन तलाक, राम मंदिर,ओबिसी समाज आयोगाला घटनात्मक दर्जाचे अधिकार, महिलांना ३३% टक्के आरक्षण संसदेत बिल पास करण्याचे अधिकार, जनजाती गौरव दिन घोषित,संविधान दिन करणे असो, की इंदु मिलच्या जागी डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनविण्याची संकल्पना असो, हे सर्व देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी च्या भाजपच्याच नेतृत्वातील सरकारने केले असताना विरोधक त्यावरून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संविधान, आरक्षण बचाव यासारखा खोटा प्रचार करत असल्याचे खा.नेते म्हणाले. २०१४ पासून एनडीए सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्याचा वापर या सरकारने देशाला मजबूत करण्यासाठीच केला आहे. भाजप कधीही संविधान किंवा आरक्षणाला धोका पोहोचवणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,ओबिसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, रिपाइं (आठवले)चे प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजित कदम, मनसेचे जिल्हाध्यक्ष धिरज परवा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुका समन्वयक सुनील पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे अबिद नाईक, भाजपचे वर्धेचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, एससी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, मंडळ अध्यक्ष अजित तांबे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कांबळे,राष्ट्रवादी चे अबिद नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.





