रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे.
यावर्षी पावसाळ्यात २२ दिवस मोठी उधाण येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जून मधील सात, जुलै मधील चार, ऑगस्ट मधील पाच, आणि सप्टेंबर मधील सहा दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडे चार मीटर पेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनाऱ्यावरील गावांना स्थानिक पातळवीर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कालावधीत उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच कालावधीत अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो.
मोठी भरती असलेले दिवस : जून महिन्यात ५ ते ८ आणि २३ ते २५, जुलै महिन्यात २२ ते २५, ऑगस्ट महिन्यात १९ ते २३, सप्टेंबर महिन्यात १७ ते २२.





