लांजा : प्रतिनिधी
“जो मै बोलता हू, वो मै डेफिनेटली करता हू!” या फिल्मी संवादाची प्रचिती लांजा-राजापूर मतदारसंघातील जनतेला आणि वारकऱ्यांना आली आहे. आमदार किरण सामंत यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या स्वखर्चातून भांबेड ते गावडी या जोड रस्त्याचे काम अखेर पूर्णत्वास नेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि वारकऱ्यांसाठी अत्यंत खडतर ठरलेल्या या घाट मार्गाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गाला आता ‘माऊली घाट’ असे नाव देण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील अंतर सुमारे ३५ ते ४० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.
माझा शब्द हेच माझे वचन! : भांबेड ते पंढरपूर अशी वैकुंठवासी हरिभक्त परायण सोनू बाबा कुरनेरकर पायी दिंडी गेल्या ३१ वर्षांपासून कार्तिकी वारीत सहभागी होत आहे. मात्र, भांबेड ते गावडी या दरम्यानचा मार्ग अतिशय खडतर होता. वारकऱ्यांना डोंगरदऱ्या, काटेकुटे आणि अवघड पायवाटांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे. २०२५ च्या कार्तिकी वारी दरम्यान जेव्हा दिंडीचे प्रस्थान झाले, तेव्हा वारकऱ्यांनी ही मोठी समस्या आमदार किरण सामंत यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी आमदार सामंत यांनी २०२६ च्या वारीपूर्वी हा रस्ता पूर्ण करून दिंडी थेट राजमार्गाने जाईल, असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी आपल्या स्वनिधीतून आणि स्वखर्चातून रस्ता तयार करून खरा करून दाखवला आहे.
आंबा आणि अनुस्कुरा घाटाला उत्तम पर्याय : हा मार्ग लांजा तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना हा ‘माऊली घाट’ एक उत्तम आणि जवळचा पर्यायी मार्ग म्हणून समोर येईल. कोल्हापूर हद्दीपर्यंत या रस्त्याचे मातीकाम पूर्ण झाले असून भविष्यात या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या भागाच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
पोकलेन ऑपरेटर आदित्य वर्मा ठरला ‘हनुमान’ : हा अवघड घाट मार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते. डोंगर पोखरून रस्ता तयार करणाऱ्या पोकलेन मशीनचा ऑपरेटर आदित्य वर्मा याने अत्यंत जिद्दीने, सेवाभावाने आणि साहसाने दिवस-रात्र एक करून हे काम वेळेत पूर्ण केले. वारकऱ्यांनी त्याचे कौतुक करताना ‘आमच्यासाठी हा हनुमान म्हणून प्रकटला’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्याच्या या मोलाच्या योगदानाबद्दल वारकरी संस्था आणि स्थानिकांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. आमदार किरण सामंत यांनी ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे शब्द पाळल्यामुळे वारकरी व स्थानिक नागरिकांमधून सध्या अत्यंत समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.

माझा शब्द हेच माझे वचन! : 


