रत्नागिरी : प्रतिनिधी
डॉ. विकास कशाळकर यांनी रचलेल्या बंदिशींचा कार्यक्रम २८ फेब्रुवारी रोजी ठीक ६ वाजता रत्नागिरी येथील गोदुताई जांभेकर विद्यालयात संपन्न झाला. गुरूऋण या कार्यक्रमाच्या अंतर्गत गुरू डॉ. विकास कशाळकर यांचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश होता. रत्नागिरीमधील मुग्धा भट सामंत, मनाली दाणी बर्वे, प्रसाद भाटवडेकर आणि सावंतवाडीच्या नूतन परब तेजमया शिष्यांनी आपल्या गायनातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्वप्रथम रत्नागिरी चे प्रसिद्ध तबला वादक श्री हेरंब जोगळेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बसंत बहार या जोडरागाने झाली. बसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद फुलांचा बहर, कशाळकर सरांच्या बंदिशीतून नेमका व्यक्त झाला आहे. “कोयल बोले अंबुवा की डारी, रूत बसंत की शोभा मन भायी । फुली सुगंध चहू ओर अंग अंग तर पवन सुहावन लागे । या विलंबित तीनतालातील ही बसंत बहारची बंदिश मनाली दाणी बर्वे यांनी अतिशय रंगतदार सादर करत वसंत ऋतूचा माहोल तयार केला.
कशाळकर सर संगीतामधील अनेक विषयांवर भाष्य करतात. असाच एक विषय सूफी संगीत, या संगीतामधील आर्त भाव “ अल्ला अल्ला करू पुकार, लेने दुवा मै आया व्दार “ या त्यांच्या परमेश्वरी रागामधे दिसून येतो. प्रसाद भाटवडेकर यांनी हा भाव नेमकेपणाने प्रस्तुत केला. सावंतवाडीतील रघुकुल स्वरविहारच्या संचालिका नूतन परब तेजम यांनी “नंद “ रागातील तिलवाडा तालातील सरांची बंदिश आकर्षक पणे सादर केली. माई री मै जागी “ या मुखड्याची डौलदार सम, बंदिशीतील लयीचा डौल छान मांडला. यानंतर गावती रागातील द्रुत बंदिश सादर केली.
मुग्ध नादच्या संचालिका मुग्धा भट सामंत यांनी नट मल्हार रागातील सरांच्या बंदिशी रंजकतेने सादर केल्या पूर्वांगात नट आणि उत्तरांगात मल्हार असलेला हा राग त्या त्या रागाच्या स्वराकृती नेमक्या दाखवत सादर केला. यानंतर जैत कल्याण या कमी स्वरांच्या रागातील द्रुत बंदिश सादर केली.कार्यक्रमाची सांगता सरांनी रचलेल्या “ओंकार आदिनाद “ या केदार रागातील चतरंग ने झाली.सर्व शिष्यांनी मिळून हा चतरंग म्हणत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला. रत्नागिरीतील जेष्ठ गायक प्रसाद गुळवणी यांच्या हस्ते सर्व कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला हेरंब जोगळेकर यांच्या तबला साथीने तसेच श्रीरंग जोगळेकर यांच्या हार्मोनियमच्या साथीने रंगत चढत गेली. सरांच्या बंदिशींचे विवेचन श्रोत्यांना सहजपणे रागांची माहितीसह सांगत डॉ. अंजली दाणी यांनी आपल्या निवेदनालाही दाद मिळवली. तसेच श्री. पांडुरंग बर्वे यांची अचूक ध्वनी व्यवस्था होती. या संपूर्ण कार्यक्रमाला श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.




