रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये असलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने समोर आला आहे. वर्षानुवर्षे कामात दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य सरकारने कठोर पावले उचलत तब्बल १६ कोटी रुपयांचा दंडात्मक बडगा उगारला आहे. कामाची मुदत न पाळणे आणि प्रवाशांना खड्ड्यांतून प्रवास करण्यास भाग पाडणे या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
एचएमपीएल (HMPL) कंपनी: आरवली ते काटे या ३९ किलोमीटरच्या टप्प्यासाठी या कंपनीला ३११ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कामाचा वेग अत्यंत संथ राहिल्याने प्रशासनाने कंपनीच्या बँक गॅरंटीमधून किंवा देयकातून ११ कोटी रुपये कपात करण्याचे आदेश दिले आहेत.इगल (Eagle) कंपनी: काटे ते वाकेड या ४९ किलोमीटरच्या टप्प्यासाठी इगल कंपनीला ५१९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. अनेकदा सूचना आणि इशारे देऊनही कामात प्रगती न झाल्याने सरकारने या कंपनीला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या दोन मोठ्या कंपन्यांवरील कठोर कारवाईमुळे महामार्गाच्या इतर टप्प्यांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. कामात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही आणि दिरंगाई झाल्यास अशीच मोठी आर्थिक कारवाई होईल, असा ठाम इशारा रस्ते विकास विभागाने दिला आहे. या दंडात्मक कारवाईनंतर तरी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला वेग मिळेल आणि प्रवाशांचा त्रास कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





