रत्नागिरी : प्रतिनिधी
इंदोर, अहमदाबाद आणि दापोली येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीत अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावले उचलणं अत्यावशक आहे असे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे म्हणणे आहे.दि. १३ जानेवारी रोजी श्री. मिलिंद कीर व सौ.हिमानी मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा प्रशासन, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच नगर परिषदेच्या अध्यक्षा यांना सविस्तर पत्र देऊन रत्नागिरी शहर व परिसरातील नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये होत असलेल्या अप्रक्रिया सांडपाणी विसर्गाबाबत गंभीर इशारा दिला आहे.
कोकण नगर व साळवी स्टॉप परिसरातील सांडपाणी थेट शिरगाव ओढ्यात सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हा ओढा नाला नसून नैसर्गिक जलप्रवाह असून त्याचा थेट परिणाम भूजल, विहिरी, बोअरवेल, शेती व नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.दापोली तालुक्यातील आडे व उटंबर गावांत ३०–४० नागरिक जुलाबाच्या साथीने बाधित झाले. प्राथमिक अंदाजानुसार कारण दूषित पाणी. ही घटना “आज दुर्लक्ष, उद्या आपत्ती” याचा ठळक इशारा असल्याचे पत्रात नमूद आहे.
रत्नागिरी शहरातून ओसवाल नगर–फणशी–वरचा/खालचा फागर वाठार–सावंत नगर मार्गे जाणारे जलप्रवाह पुढे खारफुटी असलेल्या पारटवणे खाडीमध्ये मिळतात. सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीत व समुद्रात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.साळवी स्टॉप येथील बेकायदेशीर कचऱ्याचे ढीग वारंवार पेट घेत असून विषारी धूर शहराच्या वरच्या भागात पसरतो. यामुळे चिरायू हॉस्पिटलमधील रुग्णांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याची बाब पत्रात नमूद आहे.उद्योग मंत्र्यांच्या कार्यालयासमोरील उघडी सांडपाणी वाहिनी संरक्षक अस्तराविना असल्याने भूजल झिरपण व विहिरी दूषित झाल्याच्या तक्रारी आहेत—ही स्थिती लाजिरवाणी व चिंताजनक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. MPCB चे सदस्य सचिव रत्नागिरीचे माजी जिल्हाधिकारी असल्याने प्राधान्याने तोडगा अपेक्षित होता; मात्र तसे होताना दिसत नाही, अशी ठाम नोंद करण्यात आली आहे.
- सर्व जलप्रवाहांमध्ये सांडपाणी तात्काळ थांबवणे / STP उभारणी करणे
- शिरगाव ओढा, ओसवाल–फणशी–सावंत नगर व पारटवणे खाडी येथे पाणी तपासणी व अहवाल सार्वजनिक करणे
- MPCB कडून तात्काळ स्थळभेट व कारवाई करणे
- साळवी स्टॉप कचरा हटवणे व आग प्रतिबंध आणणे
- उघडी सांडपाणी लाईन बंद करून वैज्ञानिक पुनर्बांधणी करणे
- खारफुटी क्षेत्रात कोणताही द्रवकचरा पूर्णपणे बंद करणे
- भविष्यातील आजार/हानीसाठी जबाबदारी निश्चित करणे
नैसर्गिक जलप्रवाहात अप्रक्रिया सांडपाणी सोडणे हा Water (Prevention and Control of Pollution) Act, १९७४ अंतर्गत गुन्हा असून संविधानाच्या अनुच्छेद २१ चा भंग आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रीय हरित लवाद (NGT) कडे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.




