रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई- गोवा मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून लवकरच दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांच्या प्रवासाची गैरसोय होय नये, म्हणून भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कशेडी घाट ते बोगद्यातून पुन्हा वाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. कशेडी घाटातून अवघ्या ८ मिनिटांत अंतर गाठता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी ४४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे हाती घेण्यात आले. त्यातली एकेर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा हा २ किलोमीटरचा असून एक तासाचे अंतर अवघ्या ८ मिनिटात पार होणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली. मात्र मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी वाहतुकीस परवानगी असूनही कशेडी घाटात बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने मुंबईकरांना अजूनही कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागत आहे.
२०१९ मध्ये कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यातच डिसेंबर २०२४ ची शेवटची डेडलाईन चौपदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे.





