रत्नागिरी : प्रतिनिधी
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने व नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांत मानवतेच्या सेवेस समर्पित अशा ‘जीवनदान महाकुंभ’ महारक्तदान शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.दि. ४ ते १८ जानेवारी या कालावधीत सलग १५ दिवसांत १४६० ठिकाणी महारक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून लाखो रक्तकुपिका संकलित करण्याचा संकल्प रामानंदाचार्य दक्षिण पीठाने केला आहे.
या महायज्ञात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, दादरा-नगर हवेली व दमण-दीव या राज्यांचा समावेश आहे.जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होतो. ही सामाजिक गरज ओळखून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून हा महारक्तदान संकल्प साकार करण्यात आला आहे.“अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रसेवेत सहभागी व्हावे,” असे आवाहन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी केले आहे.
या महारक्तदान शिबिरांत संकलित होणारे रक्त राज्य रक्त संक्रमण सेवाअंतर्गत शासकीय व अधिकृत रक्तपेढ्यांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. या रक्तदानाचा थेट लाभ समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना होणार असून,मायक्रोसाइटिक ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यास हे रक्तदान उपयुक्त ठरणार आहे. शासकीय रुग्णालयांतील रुग्णांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
मागील पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून या परंपरेचे सातत्य दिसून येते.२००३ साली नाशिक कुंभमेळ्यात अवघ्या १० तासांत ६४९० रक्तकुपिकांचे संकलन, २०१६ मध्ये जगद्गुरुंच्या वाढदिवसानिमित्त ७०० कॅम्पमध्ये ६५,४८७ रक्तकुपिका, २०१७ मध्ये २५,५८३ रक्तकुपिका, २०१८ मध्ये ५०,००० रक्तकुपिका, २०१९ मध्ये ६०,८९८ तर २०२४ मध्ये तब्बल ८१,१०७ रक्तकुपिका संकलित केल्या आहेत. २०२५ मध्ये केवळ १५ दिवसांत १,३६,२७२ रक्तकुपिकांचे ऐतिहासिक संकलन करण्यात आले होते.





