रत्नागिरी : प्रतिनिधी
युरोपातील इटली देशामध्ये ज्या कंपनीमुळे पर्यावरणाचा भीषण नरसंहार झाला आणि साडेतीन लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्यात विष कालवले गेले, तोच ‘कलंकित’ प्रकल्प आता रत्नागिरीच्या निसर्गरम्य वातावरणात दाखल झाला आहे. रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये ‘यलोस्टोन फाईन केमिकल्स’ (लक्ष्मी ऑरगॅनिक्सची उपकंपनी) या नावाने इटलीतील ‘मिटेनी’ (Miteni S.p.A) या कंपनीची जुनी यंत्रसामग्री वापरून उत्पादन सुरू झाल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवणाऱ्या या गंभीर विषयाबाबत राज्याचे उद्योगमंत्री पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. इथे उत्पादन सुरु असूनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्पादन सुरु नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात उद्योगमंत्री यांना एकतर सरकारी बाबूनी चुकीची माहिती दिली आहे किंवा त्यांना त्याबद्दल माहिती असूनही ते संभ्रम करत आहेत.
काय आहे ‘मिटेनी’चा काळा इतिहास : इटलीतील ‘व्हेनेटो’ प्रांतात मिटेनी कंपनी PFAS (फॉरेव्हर केमिकल्स) नावाच्या रसायनांचे उत्पादन करत होती. ही रसायने निसर्गात किंवा मानवी शरीरात कधीही नष्ट होत नाहीत. या प्रदूषणामुळे हजारो लोकांना कर्करोग आणि वंध्यत्वासारखे आजार झाले. या गुन्ह्यासाठी इटलीच्या न्यायालयाने जून २०२५ मध्ये कंपनीच्या ११ माजी अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इटलीने नाकारलेली हीच ३०० हून अधिक कंटेनर्समधील यंत्रसामग्री आता लोटे परशुराममध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे.
प्रशासकीय निष्काळजीपणा :राज्याचे उद्योग नेतृत्व या संपूर्ण प्रकरणापासून अनभिज्ञ असणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. ‘द गार्डियन’ सारख्या जागतिक माध्यमांनी या “टॉक्सिक ट्रेड” (विषारी व्यापार) वर ताशेरे ओढले असताना, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) या प्रकल्पाला परवानगी कशी दिली, हा मोठा प्रश्न आहे. उद्योगमंत्र्यांपर्यंत या विखारी प्रकल्पाची माहिती न पोहोचणे, हे प्रशासकीय यंत्रणेचे अपयश की संगनमत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोकणच्या मुळावर ‘फॉरेव्हर केमिकल्स’चे संकट : कोकणची भौगोलिक रचना आणि अर्थव्यवस्था पाहता हा प्रकल्प ‘टाइम बॉम्ब’ ठरण्याची भीती आहे.
पाण्याचे स्रोत: PFAS रसायने पाण्यात अत्यंत विरघळणारी असून ती साध्या वॉटर प्युरिफायरने (RO) स्वच्छ करता येत नाहीत. ही रसायने वशिष्टी नदी आणि भूगर्भातील पाण्यात मिसळल्यास पिण्याचे पाणी कायमचे विषारी होईल.
हापूस आणि मासेमारीवर गदा : जर या रसायनांचे अंश सापडले, तर कोकणच्या हापूस आंब्याच्या निर्यातीवर जागतिक बंदी येऊ शकते. तसेच खाडीतील मासे दूषित झाल्यामुळे कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात येईल.
काय आहे PFAS? : PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) हे मानवनिर्मित रसायनांचा एक मोठा समूह आहे, ज्याचा वापर १९४० पासून जगभरातील विविध उद्योगांमध्ये केला जात आहे. या रसायनांना ‘फॉरेव्हर केमिकल्स’ (Forever Chemicals) असे म्हणतात, कारण ती निसर्गात किंवा मानवी शरीरात कधीही पूर्णपणे नष्ट होत नाहीत. PFAS रसायनांमध्ये कार्बन (Carbon) आणि फ्लोरिन (Fluorine) यांच्यातील रासायनिक बंध अत्यंत मजबूत असतो. हा निसर्गातील सर्वात शक्तिशाली बंधांपैकी एक आहे. यामुळे ही रसायने उष्णता, तेल, डाग आणि पाण्याला रोखू शकतात. ती ऊन, वारा, पाऊस किंवा बॅक्टेरियामुळे कुजत नाहीत. ती पाण्यात अत्यंत विरघळणारी असल्याने भूगर्भातील पाण्यात (Groundwater) वेगाने पसरतात.
PFAS चा वापर कुठे होतो? : आपल्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंमध्ये PFAS असू शकते. नॉन-स्टिक भांडी: टेफ्लॉन कोटिंग (Teflon). पाणीरोधक कपडे: रेनकोट किंवा ट्रेकिंग जॅकेट्स (Waterproof fabrics).अन्न वेष्टने: पिझ्झा बॉक्सेस किंवा मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न बॅग्ज (ज्याला तेल चिटकत नाही).अग्निशमन फेस (AFFF): विमानतळावर किंवा आगी विझवण्यासाठी वापरला जाणारा फेस. डाग-रोधक कार्पेट्स आणि सोफा: ज्यावर पाणी किंवा डाग पडत नाहीत.
मानवी शरीरावर होणारे परिणाम : जेव्हा ही रसायने पाणी किंवा अन्नाद्वारे आपल्या शरीरात जातात, तेव्हा ती रक्तामध्ये साठत जातात (Bioaccumulation). यामुळे खालील आजार होतात. कर्करोग: प्रामुख्याने किडनी आणि अंडकोषाचा कॅन्सर.यकृताचे आजार: यकृतातील एन्झाइम्समध्ये बदल होणे.हार्मोनल समस्या: थायरॉईड ग्रंथींच्या कामात अडथळा.गर्भारपण: गरोदर महिलांमध्ये रक्तदाब वाढणे (Preeclampsia) आणि बाळाचे वजन कमी भरणे.रोगप्रतिकारशक्ती: मुलांमध्ये लसींचा (Vaccines) परिणाम कमी होणे.
पर्यावरणाचे चक्र (The Environmental Cycle) : PFAS एकदा पर्यावरणात सोडले की ते एका चक्रात फिरत राहतात. कारखान्यातून ते हवेत किंवा सांडपाण्यात सोडले जातात. सांडपाण्यातून ते नद्या आणि जमिनीत झिरपतात. जमिनीतून ते पिकांमध्ये आणि नद्यांतून माशांच्या शरीरात जातात.सरतेशेवटी, अन्नसाखळीद्वारे (Food Chain) ते पुन्हा मानवी ताटात पोहोचतात.





