नवी दिल्ली : प्रतिनिधी
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणवासीयांना दिलेल्या सापत्न वागणुकीबद्दल आणि रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सावंतांनी त्यांना सविस्तर पत्र सुपूर्द केले आणि या अन्यायाविरोधात दाद मागितली.
प्रचंड तफावत: मध्य रेल्वेने १९ मार्गांवरून सुमारे १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये बिहारसाठी ४५० आणि उत्तर प्रदेशसाठी ३३२ गाड्या सोडल्या आहेत. मात्र, लाखो चाकरमान्यांच्या हक्काच्या कोकण मार्गावर (मडगाव व्हाया कोकण) केवळ ३६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
फेऱ्यांमधील विरोधाभास: सीएसएमटी-गोरखपूर ही विशेष गाडी दररोज धावणार आहे, तर सीएसएमटी-मडगाव गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान आठवड्यातून केवळ एकदाच (गुरुवारी) चालवली जाणार आहे. हा विरोधाभास संतापजनक असल्याचे सावंतांनी नमूद केले.
प्रतीक्षा यादी फुल्ल: मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सारख्या नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासची ‘वेटिंग लिस्ट’ १०० च्या पुढे गेल्याची माहिती त्यांनी मंत्र्यांना दिली.
प्रमुख मागण्या : कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या तातडीने वाढवून त्या ‘दररोज’ कराव्यात. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीसाठी अतिरिक्त रेक्स (डबे) उपलब्ध करून द्यावेत.यासोबतच दादर-रत्नागिरी रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
जनआंदोलनाचा इशारा : सध्या कोकणातील रस्ते आणि घाटांमधील वाहतूक कोंडीमुळे प्रवास असुरक्षित झाला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा सावंतांनी दिला आहे. हा अन्याय दूर न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिला आहे.
मध्य रेल्वेचे धोरण उत्तर भारत केंद्रित आहे. कोकणवासीयांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांना रेल्वेने न्याय द्यावा. शिवसेना या लढ्यात कोकणवासीयांसोबत ठामपणे उभी आहे. – खासदार अरविंद सावंत





