रत्नागिरी : प्रतिनिधी
दाभील आंबेरे बस गळकी निघाल्यानंतर कारभारात सुधारणा झालेली दिसत नाही. लांजा तालुक्यातील हर्चे गावाच्या मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसची अवस्था पाहून विभागीय नियंत्रक काहीच लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे. बुधवारी सकाळी हर्चे मार्गांवरील एका बसला खिडक्यामधून पाणी आत येत होते. छत ही गळत होते. त्याशिवाय गाडी खिळखिळी झालेली होती. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरून प्रवाशांना चिंब भिजण्याचा त्रास देत होते. या बसच्या काही सीट्स फाटलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांचा प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे.
दररोज शेकडो प्रवासी – विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत – या मार्गावरून प्रवास करतात. मात्र बसची झालेली दुर्दशा पाहता प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे खिडक्यांच्या जागी थेट पावसाचा मारा होतो, आणि सीट्सवर बसणे अशक्यप्राय बनते. स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वीही एस.टी. महामंडळाकडे तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी लवकरात लवकर चांगल्या बसची मागणी करत आहेत.
अश्या अनेक बस खिळखिळया असताना विभागीय वाहतूक नियंत्रक दुर्लक्ष करत आहेत. कायम फिरतीवर असणारे विभागीय वाहतूक नियंत्रक नेमका कोणता कारभार हाकतात, असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे राज्य शासन एसटी फायद्यात यावी म्हणून विविध योजना आणून प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अकार्यक्षम अधिकारी अश्या बसची देखभाल व्यवस्थित करण्यात मागे पडत आहेत.




