रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन व जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शेअर मार्केट आणि खासगी बँकेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, अशा आमिषाने तीन महिलांची तब्बल ३४ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रथम खानविलकर (वय २२, रा. नाचणे, रत्नागिरी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ही फसवणूक मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली असून, रविवारी एका पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित खानविलकर याने शेअर मार्केट आणि कोटेक महिंद्रा बँकेत गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलांकडून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहाराद्वारे ३४.५९ लाख रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. परंतु ठरल्याप्रमाणे परतावा न मिळाल्यामुळे तसेच मूळ गुंतवलेली रक्कमही परत न आल्याने महिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार दीपक सातवी, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सागर वाळुंजकर, हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, अमित पालवे, अमोल भोसले, आणि शरद जाधव करत आहेत.




