मुंबई : प्रतिनिधी
एसटीने प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी (१५० कि.मी.पेक्षा अधिक अंतर) पूर्ण तिकीटधारकांना (सवलतधारक वगळता) १५ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. ही योजना १ जुलै २०२५पासून अमलात येणार असून, उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी ही योजना जाहीर करताना प्रवाशांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ही सवलत केवळ आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार असून, सवलतीच्या प्रवाशांना ही योजना लागू होणार नाही.
पंढरपूर आषाढी वारी किंवा गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्याचा विचार करत असलेल्या प्रवाशांसाठी ही योजना अधिकच फायदेशीर ठरणार आहे. नियमित बसेससाठी केलेल्या आगाऊ आरक्षणावर सवलत लागू होणार आहे. मात्र, अतिरिक्त लावण्यात आलेल्या जादा बसेससाठी ही सवलत मिळणार नाही.
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसेससाठीही ही सवलत लागू असून, पूर्ण तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे. प्रवाशांनी तिकीट एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (npublic.msrtcors.com), मोबाईल अॅप (MSRTC Bus Reservation) किंवा तिकीट खिडकीवरून आरक्षित केल्यास सवलतीचा लाभ मिळेल.