मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात दहावीच्या विद्यार्थ्यांनी निकाल मिळाल्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडे अपेक्षेने पाहत असतानाच, शिक्षण विभागाने मात्र विद्यार्थ्यांना निराश केले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरू झालेल्या तांत्रिक अडचणी, संकेतस्थळाच्या सतत होणाऱ्या बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मोठे नुकसान होत आहे. अर्ज सादर करताना ‘OTP न येणे’, ‘सर्व्हर डाऊन होणे’, आणि ‘डेटा सेव्ह न होणे’ यामुळे प्रवेश प्रक्रियेला अनावश्यक विलंब लागला आहे. या साऱ्या गोंधळामुळे राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेला तात्पुरती मुदतवाढ दिली असली, तरी नेमकी तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवातीलाच ब्रेक बसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून येत आहे.
- सत्तासंघर्षात सरकार गुंतलेले
- अकरावी प्रवेश प्रक्रियेत वारंवार अडचणी
- तांत्रिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
- सरकारकडून वेळेत ठोस निर्णय नाही
- पालक आणि विद्यार्थी दोघेही संभ्रमात
- विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली
शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले की, “मोबाईलवरूनही अर्ज करता येतो. आम्ही मुदतवाढ दिली असून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही.” मात्र, प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, राजकीय स्तरावर सत्तासंघर्ष, मंत्रिमंडळ फेरबदल, वादग्रस्त विधेयकं या मुद्द्यांमध्ये सरकार अडकलेले असताना, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश मिळावा, शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू व्हावे, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रणालीतील दोष दूर करावे, अशी जोरदार मागणी आता शिक्षण क्षेत्रातून आणि पालकवर्गातून होत आहे.





