मुंबई : प्रतिनिधी
हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सन्मान केला. दादर येथे १९ जूनला हा सोहळा पार पडला.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदु धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्या व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. काही अपरिहार्य कारणामुळे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना महोत्सवाला येणे शक्य न झाल्याने त्यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) संगीता जाधव, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार आणि मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक, तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’ आणि ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकांचे लेखक श्री. विक्रम भावे आणि अधिवक्त्या सौ. किशोरी कुलकर्णी उपस्थित होत्या.
माझ्या समवेत काम करणार्या सर्व अधिवक्त्यांचा हा बहुमान आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर
‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार दिल्यासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. या समष्टी कार्यामध्ये आल्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी प्रेरणा आणि शिकवण दिली. त्यांनीच मला हा पुरस्कार दिला. खरेतर मी या पुरस्कारासाठी पात्र नाही. आता राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी अनेक अधिवक्ते पुढे आले आहेत. ज्या ज्या अधिवक्त्यांनी माझ्यासमवेत काम केले आहे, त्या सर्व अधिवक्त्यांचा हा बहुमान आहे आणि अधिवक्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत आहे. ‘जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, असे मी आश्वस्त करतो.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर गेली २५ वर्षे वकिली क्षेत्रात कार्य करत असून हिंदु विधीज्ञ परिषद या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या संघटनेचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. काँग्रेसच्या काळात ‘हिंदु आतंकवादी’ ठरवण्यासाठी भयानक षड्यंत्रे रचून हिंदुत्वनिष्ठांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले. या कठीण काळात हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करण्यात काही हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनाही कचरत होत्या. अशा वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांचे खटले स्वीकारून त्यांना सर्वतोपरी साहाय्य केले. मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, मडगाव बाँबस्फोट प्रकरण, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण, नालासोपारा स्फोटकांचे प्रकरण आदी अनेक खटल्यांमध्ये संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांना विनामूल्य साहाय्य केले. हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सत्य बाजू त्यांनी समाजात ठामपणे मांडली. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांसाठी केवळ न्यायालयीन लढा दिला, असे नाही, तर हिंदुत्वासाठी योगदान देणारे आणखी अधिवक्ता निर्माण व्हावेत, यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अधिवक्त्यांचे प्रभावी संघटन केले. अधिवक्ता पुनाळेकर यांनी सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे.
अधिवक्ता पुनाळेकर यांनी केलेल्या याचिकेमुळे सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी २० टक्के खाटा विनामूल्य आणि १० टक्के खाटा सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या प्रयत्नांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ होत आहे. शासनाकडून भूखंड घेणारे ते वडिलोपार्जित असल्याचे दाखवत. अधिवक्ता पुनाळेकर यांनी केलेल्या याचिकेमुळे शासनाकडून भूखंड घेणार्यांना हा भूखंड कुणी घेतला यांसह विस्तृत माहिती तिथे फलक लावून, तसेच जिल्हाधिकार्यांच्या संकेतस्थळावर ती माहिती जनतेसाठी ठेवावी लागते. हिंदु आतंकवादाच्या फेक नेरेटिव्हमध्ये अडकवून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना कारागृहात टाकण्यात आले. ४२ दिवस त्यांना कारागृहात रहावे लागले. तरीही न डगमगता त्यांनी ‘अधिवक्ता’ म्हणून धर्मकार्यातील योगदान थांबवले नाही. अशा प्रकारे नि:स्वार्थ भावनेने हिंदुत्वासाठी लढा देणारे हे ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ समस्त धर्मप्रेमींसाठी प्रेरणादायी आहेत !





