मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील लाखो तरुणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आता ‘केवायसी’ प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपली खरी ओळख निश्चित करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून स्वतःची ‘नो युअर कस्टमर’ (KYC) पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे. आयोगाच्या नव्या नियमांनुसार, ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बनावट उमेदवार, खोट्या नावांनी अर्ज आणि इतर प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे एकच उमेदवार वेगवेगळ्या ओळखीतून अनेकदा अर्ज करतोय का, हे तपासणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने कडक निर्णय घेत, डिजिटल ओळख पडताळणी प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली केवळ विद्यार्थ्यांची ओळख निश्चित करणार नाही, तर परीक्षेतील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेलाही बळकटी देणार आहे, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.
सदर केवायसी प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन, आपली माहिती सादर करावी लागेल. यात आधार क्रमांक, पॅन कार्ड किंवा अन्य वैध ओळखपत्र, तसेच मोबाईल क्रमांकाची पडताळणी यांचा समावेश असेल. काही टप्प्यांमध्ये चेहऱ्याद्वारे ओळख पटवण्याची प्रणालीही लागू केली जाणार आहे.
केवायसी पूर्ण केल्यानंतरच उमेदवारास परीक्षेसाठी अर्ज करण्याची परवानगी मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे परीक्षेत बनावटपणा, दुसऱ्याच्या नावाने पेपर देणे आणि एजंटमार्फत गैरमार्गाने सहभागी होण्याचे प्रकार जवळपास संपुष्टात येणार आहेत. आयोगाने सांगितले की, ही यंत्रणा विद्यार्थ्यांच्या हितासाठीच असून, कोणत्याही परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ती आवश्यक होती. आता परीक्षार्थींना अधिक जबाबदारीने अर्ज करावा लागणार असून, चुकीची माहिती दिल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, असा इशारा देखील आयोगाने दिला आहे.





