रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्ग, जो एकीकडे कोकणच्या सौंदर्याला जोडणारा मार्ग मानला जातो, तोच गेल्या १८ वर्षांत मृत्यूचा सापळा ठरला आहे. या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये २,५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, हजारो जखमी झाले आहेत. ही परिस्थिती महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणावर गंभीर प्रश्न निर्माण करते. २०१० ते २०२१ या कालावधीत अपघातात २,४४२ मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अहवाल देतो. तर २०१२ ते २०२२ या कालावधीत ६,६९२ अपघात झाल्याची आणि त्यात १,५१२ मृत्यू झाल्याची माहिती सा. बांधकाम विभाग देतो. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता गत वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातच ३९९ अपघात होऊन १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपूर्ण चौपदरीकरण, रस्त्याची दुरवस्था व खड्डे, अर्धवट पूल व बायपास, वाहनचालकांची बेदरकार वृत्ती आणि ठेकेदाराचे लांगुलचालन ही या अपघातांची कारणे आहेत. महामार्गाचे काम वर्षानुवर्षे चालू आहे, पण अपघात मात्र थांबत नाहीत. प्रत्येक आठवड्याला कुणीतरी जातंय. सरकारनं याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या आधी चौपदरीकरणाच्या कामास गती देण्यात येईल, असा आश्वासक सूर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाजवला आहे. मात्र अनेक ठिकाणी काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबई-गोवा महामार्ग आता ‘मृत्यू महामार्ग’ ठरत असल्याची स्थिती आहे. अपघातांची संख्या पाहता तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून सुरक्षेची हमी देणे अत्यावश्यक झाले आहे.





