रत्नागिरी : प्रतिनिधी
मनसे नेते वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केलेल्या मनसेच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या कपात गटबाजीचे वादळ घोंगावत आहे. एक महिन्यापूर्वी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सहा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्या सहाही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहे. तसे पत्र मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने काढण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या सचिन शिंदे, जुनैद बंदरकर, अरविंद मालाडकर, मिलिंद भाटकर, संदेश साळवी, राजेंद्र गांजरे या पदाधिकाऱ्यांना पदावरून नारळ देण्यात आला आहे.
मनसे नेते वैभव खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी जुनैद बंदरकर उपजिल्हाध्यक्ष (राजापुर विधानसभा), अरविंद मालाडकर उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा), सचिन शिंदे तालुकाध्यक्ष (रत्नागिरी), मिलिंद भाटकर शहर अध्यक्ष (रत्नागिरी), संदेश साळवी तालुकाध्यक्ष (चिपळूण), राजेंद्र गांजरे शहर अध्यक्ष (चिपळूण) यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने स्थगित केल्याचे पत्र मनसे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांनी काढले आहे.
मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश सौंदळकर यांची नियुक्ती झाल्यापासून मनसेत गटबाजीचे राजकारण तीव्रतेने सुरू झाले. पक्षात शहकाटशहाचे राजकारण सुरू झाले. कार्यकर्ते एकत्रित करण्याचे सोडा, कोण मोठा, कोण नेता असले शुल्लक वाद सुरू झाले. त्यातून तीन ते चार ग्रुप तयार झाले. पक्ष वाढविण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असताना ग्रुप करून राहिल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. वैभव खेडेकर यांनी खेड शहर वगळता बाकी जिल्ह्यात पक्ष वाढीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मनसेच्या मतदार असताना गटबाजीमुळे पक्ष बांधणी होत नाही, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे. याकडे मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे लक्ष घालणार असून अनेकांची शाळा घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




