रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या धडक मोहिमेत पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मार्गाने राहणाऱ्या १३ बांगलादेशींना त्यांच्या देशात हाकलून लावण्यात यश आले आहे. आता जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यात लपलेल्या बांगलादेशीना शोधण्याचे काम या पथकाला करावे लागणार आहे. या घुसखोरांना साथ देणाऱ्या स्थानिक मदतगारांना पकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा सूर जनतेतून उमटत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाला ११ नोव्हेंबेर २०२४ रोजी एक माहिती मिळाली होती की, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी १३ बांग्लादेशी नागरिक मिळून आले होते.
वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली अशी या १३ बांगलादेशीची नावे आहेत.
या सर्वांकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली होती. याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला व या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला व मुदतीमध्ये या गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले होते.
याच प्रकरणाची सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी सर्व १३ आरोपींना प्रत्येकी ६ महीने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या सर्व १३ दोषी बांग्लादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सि यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात आली व या सर्व बांग्लादेशी नागरिकांना दिनांक २० मे २०२५ रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आलेले आहे.