रत्नागिरी : प्रतिनिधी
गेले कित्येक वर्ष रखडलेले रत्नागिरीचे बसस्थानक अखेर पूर्ण झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या अथक प्रयत्नाने हे बसस्थानक पूर्ण झाले आहे. या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा दिनांक ११ मे रोजी होणार असून त्यानंतर जनतेचे उनपावसात होणारे हाल संपणार आहेत. सामंत बंधूंच्या दूरदृष्टीतून पूर्ण झालेले हे बसस्थानक रत्नागिरीच्या सौंदर्यात भर टाकत आहे. आतापर्यंत कित्येक विकासकामे पूर्ण करत सामंत बंधूंनी विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दाच ठेवला नाही. शेवटचा बसस्थानकाचा मुद्दा होता तो ही विरोधकांच्या तोंडातून खेचून काढला आहे. त्यामुळे ‘तुम बोलते रहो, हम हमारा काम करते रहेंगे, हमे इतना टाईम नहीं है की हम आप से उलझते रहे’ या वाक्यानुसार काम काम करत रत्नागिरीच्या विकासात बसस्थानकाच्या रूपात अवघ्या १५ महिन्यात अजून एक सुन्दर वास्तू उभारली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ कॉक्रीटीकरण अंदाजे रु.१७.५० कोटीचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्ण झाले आहे. या कामाची सुरुवात फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली होती. या रा.प.रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक (ग्रामीण व शहरी) वस्तूचे लोकार्पण सोहळा दि.११ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रताप सरनाईक, मंत्री, परिवहन तथा अध्यक्ष म.रा.मा.प. महामंडळ महाराष्ट्र राज्य व उदय सामंत, मंत्री, उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कुणामुळे रखडले बसस्थानक ?
आघाडी सरकारच्या कारकिर्दीत बीओटी तत्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) रत्नागिरी बसस्थानक मंजूर करण्यात आले होते. बसस्थानकाच्या १७ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. या कामाचे भूमिपूजनदेखील झाले होते. मात्र, सत्तांतरानंतर परिवहन मंत्रीपद दिवाकर रावते यांना मिळाले. त्यांनी रत्नागिरी बसस्थानकाचा बीओटी तत्वावरील प्रस्तावच रद्द केला. त्यांनंतर नव्याने रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी दहा लाखांचा आराखडा मंजूर करण्यात आहे. आराखडा निश्चितीनंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आराखड्यात काही बदल सूचवले. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र हा निधी पुरेसा नसल्याने हे काम रखडले होते.
कुणामुळे पूर्ण झाले बसस्थानक ?
उदय सामंत हे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री झाले आणि हा प्रकल्प पूर्ण होण्यास गती मिळाली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये उद्योग मंत्री सामंत यांनी सामंजस्य करार केला. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ कॉक्रीटीकरण अंदाजे रु.१७.५० कोटीचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्ण झाले आहे. अवघ्या १५ महिन्यात काम पूर्ण झाले.
कसे आहे नूतन बसस्थानक?
प्रशस्त बसस्थानक इमारतीमध्ये ग्रामीण बसेस करीता १४ फलाट व शहरी बसेस करीता ६ फलाटांची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे. रा.प.चालक व वाहक (महिला व पुरुष) यांचे करीता सर्व सोयीयुक्त वातानुकूलित विश्रांतीगृह तसेच सर्व सोयर्थीयुक्त वातानुकूलित हिरकणी कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय, रा.प.चे इतर कार्यालये, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र प्रशस्त उपहारगृह, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवाशी प्रतिक्षालय, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र महिला व पुरुष प्रवाशी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीणसाठी ६ वाणिज्य अस्थापना गाळे व शहरीसाठी १८ वाणिज्य गाळे उपलब्ध करुन दिले आहे. संपूर्ण बसस्थानक वाहनतळास कॉक्रीटीकरण व ड्रेनेज व्यवस्था करण्यात आलेली आहे.




