मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. यावर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. यात दरवर्षीप्रमाणे कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकणच्या मुलांनी आपली निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
विभागनिहाय निकाल : पुणे-९१.३२ टक्के, कोकण- ९६.७४ टक्के, नागपूर- ९१.३२ टक्के, छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के, मुंबई- ९२.९३ टक्के, कोल्हापूर- ९३.६४ टक्के, अमरावती- ९१.४३ टक्के, नाशिक – ९१.३१ टक्के, लातूर – ८९.४६ टक्के
या वर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने यंदा कमी झाला आहे. या वर्षी कॉपी विरोधात कडक मोहिम राबवली होती. यामुळे निकाल कमी लागल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
राज्यात ११ फेब्रुवारी ते मंगळवार, १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होत्या. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, ३७ ट्रान्सजेंडर. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.





