राजापूर : प्रतिनिधी
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजापूर – लांजावासीयांसाठी एक खुशखबर पुढे आली आहे. या दोन्ही शहरासांठी नूतन आमदार किरण सामंत यांनी प्रत्येकी अडीचशे कोटींच्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावांतर्गत अन्य सुविंधासोबत केवळ मुख्यच नव्हे तर शहरातील जोडरस्तेही पक्क्या काँक्रिटचे होणार आहेत. इतकेच नव्हे तर शहराचा कायापालट करण्यात येणार आहे. गेली वीस वर्षे मागास राहिलेल्या या दोन शहरांचे रुपडे पालटणार असून आमदार किरण सामंत हे यासाठी मेहनत घेत आहेत.
दरवर्षी केलेले डांबरी रस्ते पावसाळ्यातील अतीवृष्टीने वाहून जात असल्याने रत्नागिरी शहराच्या धर्तीवर हे रस्ते काँक्रिटचेच व्हावे यासाठी त्यांचा आग्रह आहे. दरम्यान यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद शासनाकडून करवून घेण्यासाठी आपण बांधील असून भविष्यात आपल्या मतदारसंघात होणार कोणताही विकास हा शाश्वत व प्रदिर्घकाळाचा असावा हे आपले मत असल्याचे आ. किरण सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
विकासाच्याबाबतीत पिछाडीवर असलेला मतदारसंघ म्हणून लांजा-राजापूरची निवड करून आपण या मतदारसंघाची निवडणूक लढवत असल्याचे आ. किरण सामंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहिर केले होते. निवडुन आल्यानंतर आ. सामंत हे पूर्ण ताकतीनिशी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागासोबतच राजापूर व लांजा शहराच्या पायाभूत विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही शहरांच्या प्राथमिक विकासाच्या दृष्टीने केवळ मुख्य रस्ताच नव्हे तर शहराला जोडणारे व अंतर्गत रस्तेही काँक्रिटचे व्हावे यावर आ. सामंत यांचा भर आहे.




