रत्नागिरी : प्रतिनिधी
खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या टेरीफ यांच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने रत्नागिरीमधील ग्राहक ही आता बीएसएनएलकडे वळू लागले आहेत. हे ग्राहक टिकून राहावेत, त्यांना विनाअडथळा सेवा मिळावी म्हणून बीएसएनएल ने कंबर कसली आहे. शहरासह रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवे १८८ टॉवर युद्ध पातळीवर उभारण्याचे काम नुकतेच हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बीएसएनएल ला रेंज नाही अशी तक्रार लवकरच इतिहास जमा होणार आहे.
उपप्रबंधक अरुण चवळी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांचा ओढा बीएसएनएलकडे वाढत आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे बीएसएनएल वर लोकांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे आमच्या सेवा अधिक सशक्त कशा होतील, याकडे आमचे लक्ष आहे. फोरजी सॅच्युरेशन ही मोहीम आम्ही हाती घेतली असून, या माध्यमातून जिल्ह्यात १८८ टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे.
सध्या रत्नागिरी मध्ये ३२४ टॉवर आहेत यात नव्या १८८ टॉवरची भर पडणार आहे. त्यामुळे खासगी खासगी कंपन्यांपेक्षा बीएसएनएलच्या टॉवरची संख्या वाढलेली दिसेल १८८ पैकी ९० टॉवरचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले असून, हे अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित ९८ टॉवर उभे करण्यासाठी तांत्रिक कामे चालू आहेत. ती पूर्ण करून आम्हाला तारीख ३डिसेंबरपर्यंत ते टॉवर उभे करायचे आहेत त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होतील. रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्ग मध्ये दीडशे कोल्हापूर मध्ये शंभर नवे टॉवर आम्ही उभे करीत आहोत याशिवाय या तीनही जिल्ह्यात आणखी टॉवरची आवश्यकता आहे का याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे असेही श्री. चवळी यांनी सांगितले.
जुलै महिन्यात साडेतीन हजार सिम खरेदी
श्री. चवळी म्हणाले खासगी दूरसंचार कंपन्यांनी 25% दरवाढ केली असली तरी बीएसएनएल ने कसलीही दरवाढ केलेली नाही त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बीएसएनएल कडे वळत आहेत. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरीत साडेतीन हजार जणांनी बीएसएनएलचे सिम कार्ड घेतले आहे. याच कालावधीत जवळपास 1400 जणांनी आपले खासगी कंपन्यांचे सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केले आहे. बीएसएनएल चे नवीन सिम कार्ड घेण्याकडे आणि पोर्ट काढण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे.




