कौशल्य विकास केंद्राच्या बोगस परीक्षार्थी घोटाळ्याचा अभाविपने केला पर्दाफाश
रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वृद्धी होण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेल्या योजनेत भ्रष्टाचार करणारी टोळी रत्नागिरी येथे उघडकीस आली आहे. अश्या बनावट आधारकार्ड बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विदयार्थी परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
रत्नागिरी येथील कौशल्य विकास केंद्रावर विद्यार्थ्यांच्या नावावर तेथील कर्मचारी व अन्य लोक त्या विद्यार्थ्यांचे बनावट आधार कार्ड व ओळखपत्र बनवून परीक्षा देत होते. हा सगळा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. स्थानिक पोलीस आणि मीडियाला सोबत घेऊन थेट परीक्षा केंद्रावर धाड टाकत अभाविप कार्यकर्त्यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणला आहे.
अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, “रत्नागिरीच्या कौशल्य विकास केंद्रात बनावट विद्यार्थी बसवून परीक्षा घेणं हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. अभाविप महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालकांकडे मागणी करते की, त्वरित या विषयाची उच्चस्तरीय चौकशी करून केंद्र संचालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा अभाविपकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलावी.”
अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्हा सहसंयोजक तेजस खरे म्हणाले की, “बोगस विद्यार्थ्यांना घेऊन परीक्षा देणाऱ्या केंद्राच्या विरोधात अभाविपच्या वतीने पोलीस तक्रार नोंदविण्यात आली आहे व विद्यार्थ्यांच्या नावाने बोगस पैसे उकळणाऱ्या टोळी विरोधात अभाविप रत्नागिरीचा लढा चालू राहील.”




