कोकणातील महत्वाच्या ६ जागा म्हणजे पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग महायुतीने जबरदस्त जिंकल्या. अर्थात यामागे किंगमेकर म्हणून जी भूमिका बजावण्यासाठी रात्रंदिवस एक व्यक्तिमत्व मेहनत घेत होते, ते म्हणजे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण! कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस यांना पाणी पाजून सर्व जागा महायुतीच्या पारड्यात घालण्यात रवींद्र चव्हाण यांचा वाटा मोलाचा आहे. भाजपच्या २, अजित पवार गटाची एकमेव जागा आणि शिंदे गटाच्या ३ जागा ज्या आल्या त्यामागे एक मास्टरमाईंड खेळी रवींद्र चव्हाण यांची होती.
कोणीही कितीही म्हटले की कोकणात किंगमेकर आम्हीच आहोत, तरी किंगमेकर होण्यासाठी काहीतरी यश मिळवून द्यायला हवे म्हणजे किंग तयार करायला हवेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता, पालघर – हेमंत सावरा (भाजप), कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना), ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना), रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी), मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना), रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे (भाजप) महायुतीकडून निवडून आले. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर सगळी समीकरणे बदलली होती. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोकण प्रांत उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहील अशी अटकळ सगळे प्रकांड पंडित मांडत होते. मात्र महाराष्ट्रातील एकूण निकालाची परिस्थिती पाहता, कोकणचा बालेकिल्ला महायुतीकडे आला. तटकरे यांनी आपली सीट राखली परंतु इथल्या भाजपमधील नाराजी दूर करण्यात रवींद्र चव्हाण यांनी भूमिका वठवल्याने तटकरे यांचा मार्ग सुकर झाला. श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या मतदारसंघात खुद्द रवींद्र चव्हाण यांनी भक्कम पाठिंबा दिला नसता तर इथले चित्र बिघडले असते. मात्र रवींद्र चव्हाण यांनी इथे महायुतीचा धर्म पाळून शब्दाला किंमत असते, हे दाखवून दिले.
काही नेते सोबत राहिल्याचे नाटक करून युतीत बेबनाव करतात, मात्र चव्हाण यांनी सच्चा दिलाने काम केले. कल्याण, ठाणे आपला बालेकिल्ला असताना शिंदे गटाच्या नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण कबूल करतील! मावळ लोकसभा मतदारसंघाची जितक्या भागाची जबाबदारी चव्हाण यांच्यावर होती, तिथे ती शिंदे गटाच्या बारणे यांना विजयात भर टाकणारी ठरली. एकप्रकारे युतिधर्म पाळून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडून आणण्यात रवींद्र चव्हाण यांची भूमिका किंगमेकरची ठरली.
महायुती धर्म पाळताना, कोकणात भाजपच्या हेमंत सावरा (पालघर) आणि नारायण राणे (रत्नागिरी – सिंधुदुर्ग) या दोन जागा जिंकण्यात रवींद्र चव्हाण यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. मंत्री चव्हाण यांनी नारायण राणेंची उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच येथील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती. गावदौरे, मतदारसंघात बैठका आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची वज्रमूठ बांधत रविंद्र चव्हाण यांनी राणेंसाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. १९७७ च्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाच्या बाबासाहेब परुळेकरांनी काँग्रेसच्या शांताराम पेजे यांचा २५,३०० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आज ४७ वर्षांनी नारायण राणे यांनी विजय प्राप्त करून जवळपास पाच दशकांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मात्र, सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तिन्ही ठिकाणी भाजपाने रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बरीच विकासकामे आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी वाटप केलेले असल्याने राणेंचा विजय येथे सोपा झाला.
सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका घ्यायच्या, प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घ्यायचा, प्रचार सभा नियोजन करायचे, कोणाचे हेवेदावे रुसवेफुगवे असतील तर ते दूर करायचे, कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांच्यात समन्वय राखायचा, हे सगळं चव्हाण लीलया पार पाडत गेले. त्यामुळेच आज महायुतीला कोकणातील ६ जागा पटकावता आल्या. चव्हाण हे निवडणूक नियोजन व व्यवस्थापन, राजकीय डावपेच आणि मतदारांच्या मनाचा कौल ओळखण्यात ते अत्यंत तरबेज आहेत. कोकणची कौटुंबिक पार्श्वभूमी व सिंधुदुर्ग पालकमंत्री असल्याने विरोधकांची गणितं आणि त्यांच्या मर्यादाही त्यांना तोंडपाठ आहेत. लोकांमध्ये वावरताना स्वतःच्या मंत्रिपदाचा लवलेशही सोबत न बाळगणारा आणि मातीशी नाळ जुळलेला राजकारणी अशी त्यांची ओळख. राणेंच्या उमेदवारीला रविंद्र चव्हाणांची हे कबस आणि रणनिती माईलस्टोन ठरली. भाजपने राज्यात बहुतांश जागा गमावल्या, पण कोकणात कमबॅक केलं. संपूर्ण कोकणचा विचार करता, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कोकणात भाजपचे कमळ फुळविण्यात , शिवसेनेचा धनुष्य चालविण्यात, राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक सुरू करण्यात किंगमेकर ठरले….!
‘रत्नागिरी’साठी आश्वासक चेहरा!
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांच्या साथीला भाजप पक्षातील अनेकांचा हातभार लागला. लोकसभा निवडणुकीत केवळ रवींद्र चव्हाण यांचे स्विय सहायक म्हणून काम न करता त्यासोबत भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या अनिकेत पटवर्धन अनेकांना अनुभवायला मिळाला असेल. भाजप युवा नेते अनिकेत पटवर्धन यांनी जितक्या तळमळीने काम केले, त्याला तोड नाही. कोणत्याही पदाच्या लालसेपोटी काम करणारे असंख्य असतात, पण कोणतीही लालसा न ठेवता काम करणारे दुर्मिळ. त्या दुर्मिळ कार्यकर्त्यात अनिकेत पटवर्धन या युवा नेत्याच नाव घ्यावं लागेल. अर्थात रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत भाजपने हा युवा चेहरा आजमवायला हरकत नाही. रत्नागिरी भाजपकडे चेहरा नाही, असा नरेटिव्ह सेट करणाऱ्या विरोधकांना अनिकेत पटवर्धन हा नवीन आणि आश्वासक चेहरा दिसायला हवा. भाजपमधील धुरंधर याचा विचार नक्की करतील…!






