खरंतर गुंता हा शब्दच कोणाला फारसा आवडत नाही. म्हणजे बघा हं, तुम्ही लोकर गुंडाळताय आणि ती गुंतली तर काय होईल? किती त्रासदायक होतं तो गुंता सोडवणं? तसंच अजून एक उदाहरण बघा. वॉशिंग मशीन मधून कपडे काढताना ते जे काही असे गुंतलेले असतात की काही विचारूच नका.
पण अशा वेळेला आपण काय करतो? पहिल्यांदा तर चिडचिड होते. मग हा गुंता सोडवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घेऊन त्यावर काम करायला सुरुवात करतो. लोकरीचे हातातील टोक व्यवस्थित बघून त्या धाग्यांमधून अलगद सोडवत गुंडा पूर्ण करतो. तीच गत वॉशिंग मशीन मधल्या कपड्यांची. एकेक कपडा नीट मोकळा करून सोडवून घेतो आणि मग सगळा कपड्यांचा गुंता सुटतो.
या प्रक्रियेत एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे संयम. अतिशय धीराने, संयमाने एकेक धाग्याचा पेड मोकळा करावा लागतो, एकेक कपडा हळुवार मोकळा वेगळा करावा लागतो. आपल्या संयमाची परीक्षा म्हणजे ही गुंत्याची सोडवणूक!
पण मग हाच संयम विचारांचा गुंता सोडवताना कुठे नाहीसा होतो? संयमाची जागा चिडचिड घेते आणि कडेलोट म्हणजे संयमाची जागा नैराश्येने भरते. उगीच सगळं संपून गेलंय, काहीच मार्ग शिल्लक राहिला नाही असं वाटत राहतं. विचारांना एक ना अनेक फाटे फुटतात आणि त्या फाट्यांच्यामागे लागून बऱ्याचदा आपण मुख्य मुद्द्यापासून दूर होतो.
असं बऱ्याचदा घडतं की विचारांचा गुंता आपल्याला एक तर भूतकाळात रमवतो किंवा भविष्याच्या स्वप्नात, अपेक्षांच्यात गुंतवतो. मग आपण वर्तमानाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि गुंत्याच्या गुंत्यात गुंतत जातो. हेच ते मी वर म्हटलेलं मुख्य मुद्द्यापासून दूर जाणे.
पण मग प्रश्न उरतोच की हा गुंता सोडवावा कसा? खरं तर प्रत्येकाचे विचार वेगळा आणि म्हणूनच गुंत्याची गुंतागुंत वेगळी. कोणाचा गुंता अधिक क्लिष्ट तर कोणाचा कमी. पण तरीही होता होईतो अत्यंत संयमाने, न चिडता हा गुंता सोडवण्यास घ्यावा. कुठला मुद्दा हा मूळ मुद्दा आहे हे ठरवून त्यावरच काम करायला घ्यावं. कारण नाहीतर वरवरचे मुद्दे आपल्याला मुळापर्यंत पोचू देणार नाहीत आणि आपण अजूनच गुंतत जाऊ.

गुंत्याचं मुख्य कारण कळलं की त्यावर शक्य ते सगळे उपाय निरखावेत आणि त्यातील जो सर्वोत्तम असेल तोच अमलात आणावा. मूळावरच घाव घातला म्हणजे गुंता खणात नाहीसा होईल. छान मोकळं मोकळं वाटू लागेल आणि मनाची अवस्था सुधीर मोघे यांच्या “फिटे अंधाराचे जाळे। झाले मोकळे आकाश”, या ओळींसारखी होईल.
– उमा जोशी





