मुंबई : प्रतिनिधी
१० मे या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवण्यात आले होते, हे न्यायालयाच्या या निकालातून स्पष्ट झाले असून दाभोलकर परिवार आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात असल्याचे विधान करून हत्येच्या तपासाची दिशा भरकटवण्याचे काम केले होते. ज्यामुळे सीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतरही न्याय मिळण्यासाठी ११ वर्षांचा कालावधी लागला, असे सूत्र सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेला संबोधित करतांना केले.
मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत राजहंस यांच्यासोबत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि हिंदु जनजागृती समितीचे सतीश कोचरेकर व्यासपिठावर उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सर्वश्री चेतन राजहंस, रमेश शिंदे आणि अधिवक्ता घनश्याम उपाध्याय यांनी उत्तरे दिली.
राजहंस पुढे म्हणाले की, वर्ष २००८ ते २०१४ या राज्यातील काँग्रेसच्या राजवटीत भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र राबवण्यात आले. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत सत्तापालट होऊ द्यायचा नसेल, तर भगवा आतंकवाद लोकांच्या मनावर बिंबवायला हवा, असा त्यांचा प्रयत्न चालू होता. त्यासाठीच या प्रकरणाची दिशा भरकटवली गेली. डॉ. दाभोलकरांची हत्या ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी खंडेलवाल आणि नागोरी या २ कुख्यात गुंडांना मुंब्रा अन् कोपरखैरणे येथून खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या बंदुकीतूनच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून सिद्ध झाले होते. त्यांची अधिक तपासणी केल्यानांतर गोव्यातून मंगेश चौधरी आणि रुसूल अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली. रसूल अन्सारी याला अटक केल्यानांतर पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेले हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र उघड झाले. सीबीआयने या सर्वांना ‘क्लीन चिट’ देऊन खंडेलवाल आणि नागोरी यांना सोडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्याचे प्रयत्न चालू झाले.
राजहंस पुढे म्हणाले की, सनातनच्या सोळाशे साधकांच्या परिवारांच्या आणि हितचिंतकांच्या चौकशा करण्यात आल्या. सनातनच्या आश्रमांवर धाडी घालण्यात आल्या. सनातनच्या आर्थिक खात्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात सनातनचे साधक विक्रम भावे यांच्यावर खोटा आरोप करून त्यांना अकारण २ वर्षे कारागृहात डांबण्यात आले. डॉ. तावडे यांना अटक केल्यानंतर दाभोलकर परिवाराने ‘डॉ. तावडे हेच दाभोलकर हत्येचे प्रमुख सूत्रधार’ असल्याचे सांगायला आरंभ केला. त्यांनी सनातनचे साधक सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोलकरांची हत्या केल्याची दवंडी पिटवली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सनातन संस्थेचे अकोलकर आणि पवार यांची मारेकरी म्हणून भित्तीपत्रके लावून सनातन संस्थेची अपकीर्ती केली. आरंभी खंडेलवाल आणि नागोरी अन् नंतर सनातनच्या विविध साधकांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी ‘सनातनचा गट’ कार्यरत असून राज्यात आतंकवादी कारवाया करू पाहत असल्याचे चित्र निर्माण करून युएपीए (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) लावण्यात आला; परंतु न्यायालयाने आज हा रहित केला.
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा येण्यापूर्वी त्याच्या मसुद्याचा अभ्यास करून त्यातील जाचक कलमे कशी न्यून करता येतील, याविषयीचा अभ्यास करत होते. डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी त्यांना अटक केल्यानंतर दाभोलकर परिवाराने डॉ. तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे सर्वांना सांगितले. आज ११ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर हेच दाभोलकर कुटुंबीय दाभोलकर हत्येचे प्रमुख सूत्रधार मोकाट असल्याचे सांगत आहेत. त्यासाठी ही मंडळी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी गुन्हे अन्वेषण विभागाला विचारले असता त्यांना चौकशी पूर्ण झाल्याचेच सांगितले आहे. दाभोलकर परिवाराच्या म्हणण्यानुसार प्रमुख सूत्रधार जर अद्याप बाहेरच आहेत, तर डॉ. तावडे यांना या प्रकरणी का गोवण्यात आले ? डॉ. तावडे यांना या प्रकरणात गोवण्यात आले, तेव्हा जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात वर्ष २०१६ मध्ये सादर करण्यात आला, त्या संजय साडविलकरांवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ६०० किलो चांदीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१५ मध्ये उघड केला होता. त्यामुळे या ठिकाणी संशयाला वाव आहे.
यावेळी रमेश शिंदे पुढे म्हणाले की, अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर शस्त्र नष्ट करण्याचा आदेश दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. हे शस्त्र शोधण्यासाठी नॉर्वेतील ज्या आस्थापनाला कंत्राट दिले होते, त्या आस्थापनाने ३ मास शोध घेऊन समुद्राच्या तळातून एक ‘एअरगन’ बाहेर काढली. डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेली गोळी या ‘एअरगन’मधून झाडलेली नव्हती, हेही पुढे सिद्ध झाले. त्यामुळे हा सर्व खर्च वाया गेला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना न्यायालयीन साहाय्य करणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना नाहक गोवण्यात आले होते, हेच यातून सिद्ध होते. विक्रम भावे यांनी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाची सत्यता एका पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणली होती. याशिवाय ते अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना त्यांच्या कामात साहाय्य करत होते. त्यांच्यावर दाभोलकर हत्येपूर्वी तेथील जागेची रेकी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांनी ज्या वेळी रेकी केली, त्या वेळी त्यांच्या भ्रमणध्वनीचे ‘लोकेशन’ (ठिकाण) त्या ठिकाणचे असायला हवे; मात्र ते तसे नव्हते, असे शिंदे म्हणाले.





